

सफाळे: पश्चिम उपनगरी रेल्वेसाठी दिलासादायक ठरलेल्या डहाणू-खारबाव-जेएनपीटी दरम्यानच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मार्गावर 31 मार्च 2026 रोजी मालगाड्यांची यशस्वी चाचणी पार पडली.
या महत्त्वाच्या टप्प्यामुळे खारबाव ते दिल्ली दरम्यान अखंड मालवाहतुकीचा मार्ग तयार झाला असून, पश्चिम रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. परिणामी, डहाणू लोकल फेऱ्या वाढविण्यासाठी मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
एप्रिल 2006 मध्ये मंजूर झालेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 30 ऑक्टोबर 2006 रोजी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरची स्थापना करण्यात आली. दादरी (उत्तर प्रदेश) ते जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीटी , नवी मुंबई) असा सुमारे 1,506 किमी लांबीचा हा मार्ग देशातील सर्वात मोठ्या मालवाहतूक प्रकल्पांपैकी एक मानला जातो.
उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या पाच राज्यांमधून हा कॉरिडॉर जातो. दादरी ते संजाण (गुजरात) हा टप्पा आधीच सुरू होता. आता पालघर ते जेएनपीटी (खारबावमार्गे) हा उर्वरित महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यामुळे खारबाव ते दिल्ली दरम्यान अखंड मालवाहतूक शक्य झाली आहे.
या प्रकल्पामुळे: मुख्य मार्गावरील मालगाड्यांचा ताण कमी होणार, प्रवासी गाड्यांचा वेळेवर धावण्याचा दर सुधारेल, डबल स्टॅक कंटेनर मालगाड्या सहज धावू शकणार,औद्योगिक क्षेत्रे आणि बंदरांना वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. रेल्वे नियंत्रणाच्या माहितीनुसार, सध्या मुख्य मार्गावर दिवसाला सुमारे 50 मालगाड्या धावत होत्या, ज्यामुळे अंदाजे 75 लोकल फेऱ्यांएवढी क्षमता अडलेली होती.
आता डहाणू लोकल सेवा वाढवा!
मालगाड्या डीएफसीसी मार्गावर वळवल्यानंतर मुख्य लाईनवर मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे: डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. प्रवाशांना अधिक सुविधा आणि कमी गर्दी होईल. मात्र, यासाठी रेल्वे प्रशासनाची इच्छाशक्ती आणि लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरणार आहे. स्थानिक प्रवासी आणि नागरिकांकडून आता डहाणू लोकल सेवा वाढविण्याची जोरदार मागणी होण्याची शक्यता असून, रेल्वे प्रशासनाने याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.