पालघर लोकसभेत शिवसेना विरुद्ध उबाठा लढतीची शक्यता ?
मोखाडा : हनिफ शेख : सध्या पालघर जिल्हयात लोकसभा निवडणुकी संदर्भात भाजप आणि शिवसेनेकडून मोठया प्रमाणात कार्यक्रम राबविले जात आहेत. पोटनिवडणूक असो की लोकसभा निवडणूक नेहमीच ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आणि लक्षवेधी राहीलेली आहे. यंदा तर अधिक लक्षवेधी ठरेल अशी स्थिती आहे. ( शिवसेना विरुद्ध उबाठा )
संबंंधित बातम्या
- Delhi Accident : कारची ट्रकला पाठीमागून जोराची धडक; दोन पोलिस निरीक्षक ठार
- Rohit Sharma : रोहितच्या टार्गेटवर तीन विक्रम
- Ram Mandir inauguration : PM मोदींनी केले हरिहरन यांनी गायलेले राम भजनाचे काैतुक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही जागा आणि हा जिल्हा महत्त्वाचा आहे. मात्र, महायुती मधील भाजपने ही लोकसभा लढवण्या संदर्भात अनेकदा जाहीर वक्तव्य आणि बैठका मधूनही मागणी केलेली आहे, मात्र, गेल्या काही दिवसांत शिवसेनेच्या वरीष्ठ आणि महत्त्वाच्या नेत्यांनी थेट ही जागा शिवसेना लढवणार आणि उमेदवार विद्यमान खासदार राजेंद्र गावीत हेच असतील असे ठाम सांगितल्याने भाजपची गोची झाली आहे.
या जागेवरून बेबनाव होण्याची चिन्हे असली तरी महायुतीकडून जिल्हाभर विविध कार्यक्रम, पक्षीय बैठकांचा सपाटा लावला असतानाच महाविकास आघाडी मात्र, याबाबत सुस्त असल्याचे दिसून येत होते. मात्र आता महाविकास आघाडीमध्ये ही हालचालींना वेग आला असून जिल्हयातील सर्व जिल्हाध्यक्ष यांची एक गुप्त आणि महत्त्वाची बैठक जव्हार येथे पार पडली असून यामध्ये ही जागा कोणी लढायची यापुढची रणनीती ठरली असून काही दिवसांतच महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक जाहीर बैठक होणार असून तसे या बैठकीत ठरल्याचे आता समोर येत आहे.
पालघर लोकसभा स्थापणे पासून पारंपारीक पद्धतीने भाजपची होती. मात्र 2018 मध्ये पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकमेकांसमोर लढले यात भाजपने विजय मिळवला यानंतर 2019 च्या लोकसभेत ही जागा शिवसेने आपल्याकडे घेत जिंकली यावेळी उमेदवार तेच राहिले मात्र पक्ष बदलत राजेंद्र गावीत पुन्हा निवडून आले आता पुन्हा ही जागा शिवसेना लढवणार आणि उमेदवार ही गावीतच राहणार असे थेट मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
असे असताना महाविकास आघाडीत मात्र अजूनही या निवडणुकी संदर्भात जागा कोण लढणार याबाबत संभ्रमाचे वातावरण असतानाच काँग्रेस, उबाठा,राष्ट्रवादी,सीपीएम या पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची एक बैठक नुकतीच जव्हार येथे पार पडल्याचे वृत्त हाती लागले असून या बैठकीत बहुजन विकास आघाडी महाविकास आघाडी कडून लढणार की कसे यावर खलबते झाल्याची माहिती समोर आली आहे. नुकत्यात झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विकास मोरे, राजेंद्र पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुनिल भुसारा उबाठाचे नेते सहसंपर्क प्रमुख निलेश गंधे आदी उपस्थित होते. ( शिवसेना विरुद्ध उबाठा )