

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न, शासनाची चालढकल आणि कर्मचाऱ्यांची होणारी कोंडी याविरोधात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने आता थेट आरपारच्या लढ्याची घोषणा केली आहे. शेगाव येथे पार पडलेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत, 'प्रलंबित मागण्या तत्काळ निकाली काढा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू,' असा स्पष्ट इशारा सरकारला दिला आहे.
संतनगरी शेगाव येथे राज्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही वादळी बैठक पार पडली. राज्यातील २३ जिल्ह्यांतील अध्यक्षांनी आपापल्या भागातील कर्मचाऱ्यांच्या व्यथा आणि अन्यायाचा पाढा बैठकीत वाचून दाखवला.
कर्मचाऱ्यांच्या असंतोषाची दखल घेत, शासनाने मागण्या मान्य न केल्यास संपूर्ण राज्यभरात कामकाज ठप्प करण्याचा निर्धार युनियनने व्यक्त केला आहे. बैठकीत जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू करून कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करावे, वेतन त्रुटी तातडीने दूर कराव्यात तसेच पदोन्नतीचा कोटा १५ वरून थेट २५ टक्के करावा,
कंत्राटी भरती पद्धत पूर्णपणे रद्द करून रिक्त पदे कायमस्वरूपी भरावीत, वाहनचालक व सेवकांची सर्व रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत, वर्ग-४ कर्मचाऱ्यांच्या धुलाई भत्त्यात भरीव वाढ करावी आणि वाहनचालकांना आरोग्य कर्मचारी म्हणून पदोन्नती द्यावी, जिल्हा परिषदेच्या आकृतिबंधाची पुनर्रचना करून वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात या मागण्या करण्यात येऊन यावर चर्चा झाली.
बैठकीत नाशिक जिल्हा परिषद युनियनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कवडे यांनी युनियनच्या कामकाजाचा आढावा सादर करत, प्रलंबित प्रश्नांबाबत आवाज उठविण्याची मागणी केली. बैठकीला नाशिक जिल्ह्यातून राज्य कोषाध्यक्ष विजयकुमार हळदे, कार्याध्यक्ष राजेश आहेर, कल्पना कापडणीस, सचिव संदीप दराडे, रोहिदास जाधव, वसंतराव जायभावे, श्याम पाटील, विजय संधान, शालिग्राम उदावंत, श्रीरंग दीक्षित, अविनाश विधाते, ज्ञानेश्वर गायकवाड, विनय जाधव, ओम पाटोळे, सचिन पाटील, विजया सोनुने आणि संगीता वालावकर या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवला.
संघटनेसाठी प्रदीर्घ काळ लढा देणारे माजी राज्याध्यक्ष बलराज मगर यांना बैठकीत 'कर्मयोगी' मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. लेखा कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष मिलिंद कांबळे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. बुलढाणा शाखेचे अध्यक्ष राजेंद्र वायनदेशकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सभेचे यशस्वी नियोजन केले.