

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
शिक्षण विभागातील ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रियेतील गुंतागुंत, लालफितीचा कारभार आणि प्रशासकीय दिरंगाई यामुळे सर्वसामान्य पालकांची मोठी पिळवणूक होत असल्याचे चित्र समोर आले आहे. येवला तालुक्यातील सायगाव येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कागदपत्रांतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी पालकांना पाच महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
सावळीराम राजाराम गिडगे (नगरसूल, ता. येवला) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलगा ऋषिकेश सावळीराम गिडगे याच्या दहावीच्या गुणपत्रिकेवरील आडनावात चूक झाल्याने दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, दहावीची चूक दुरुस्त झाल्यानंतर बारावीच्या गुणपत्रिकेतही त्याच प्रकारची त्रुटी आढळून आली.
त्यामुळे कागदपत्रांच्या दुरुस्तीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय, शिक्षण मंडळ आणि इतर विभागांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. कधी कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी, कधी ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, तर कधी अर्ज व आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात जावे लागले. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांची बदली झाल्याने प्रकरण आणखी रखडल्याचा आरोप पालकांनी केला.
आता उपसंचालकांच्या स्वाक्षरीनंतरच संबंधित कागदपत्रे मंडळ कार्यालयात जमा करता येणार असल्याने पालकांची धावपळ कायम आहे. या प्रशासकीय विलंबाचा फटका थेट विद्यार्थ्याला बसला असून, सैन्य भरतीसाठी तयारी करणाऱ्या ऋषिकेशला यंदाच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी गमवावी लागल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शिक्षण विभागाने अशा प्रकरणांचा तातडीने निपटारा करून विद्यार्थी व पालकांना दिलासा द्यावा, तसेच शैक्षणिक कागदपत्रांतील चुका वेळेत दुरुस्त करण्यासाठी सुलभ व प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी संबंधित पालकांकडून करण्यात येत आहे.