जिल्ह्यात धार्मिक पर्यटनासह ६८ किल्ले, निसर्गरम्य ठिकाणे, धबधबे, साहसी पर्यटनासाठी डोंगर, संपन्न कृषी क्षेत्र, पुरातत्त्व वारसा स्थळे, धरणे असे नानाविध पर्यटनाची ठिकाणे उपलब्ध आहेत. त्यासाठी शासनाची पर्यटनपूरक धोरणे, राजकीय इच्छाशक्ती अन् स्थानिकांचा सहभाग यांच्या समन्वयनातू काम झाल्यास नाशिक राज्यातील क्रमांक एकचे पर्यटन केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास पर्यटन अभ्यासकांनी व्यक्त केला.
तीर्थक्षेत्राचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यात धार्मिक पर्यटनाव्यतिरिक्त बहुविध स्रोत आहेत. जिल्ह्यात एकूण लहान-मोठे ६९ किल्ले, भिवतास, बिलकससारखी निसर्गरम्य स्थळे आहेत. धरणांचा जिल्हा असल्याने समृद्ध शेती आहे. त्यामुळे कृषी पर्यटनास अधिक वाव आहे. रामसरचा दर्जा मिळालेले नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य व हरणांसाठी प्रसिद्ध ममदापूर, अशी पक्षी-प्राणी ठिकाणे आकर्षणे आहेत. स्वा. सावरकर, तात्या टोपे यांच्यासारख्या महान क्रांतिकारकांची भूमी असलेल्या भूमीत भौगोलिक वैविध्य, पश्चिम घाटाचा मोठा भाग, यामुळे पर्यटनाला वाव मोठा आहे. मात्र त्र्यंबक, वणी, इगतपुरी (विपश्यना केंद्र) येथे येणारा धार्मिक पर्यटक दीड ते दोन दिवसांत जिल्ह्यातून वापस जातो. त्याचा मुक्काम वाढवण्यासाठी धार्मिक पर्यटनासह इतर पर्याय वाढवणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
गड-किल्ल्यांचे स्वच्छता, सुरक्षा आदी कार्यात तेथील स्थानिक लोकांना समाविष्ट करून घेतल्यास त्यांचे संवर्धन शक्य आहे. पर्यटनविभाग प्रसिद्धी, प्रचारासह आनुषंगिक गोष्टींसाठी पूर्ण सहकार्य करेल. जिल्ह्यात साहसी पर्यटनासाठीही उत्तम लोकेशन आहेत. या पर्यटनासाठी सुरक्षा नियम, अटीच्या अधीन राहून तसे काम होत असेल तर नाशिक हे साहस पर्यटन क्षेत्र म्हणून पुढे येईल.
- जगदीश चव्हाण, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी, नाशिक
धार्मिक पर्यटकांना येथे कृषी पर्यटन, स्मारके, पुरातत्त्व स्थळे, निसर्ग, साहसी आदी पर्यटनाकडे वळल्यास नाशिकचा सर्वंकष पर्यटन विकास शक्य आहे. सर्वच स्थळांचे दमदार ब्रॅण्डिंग करून विकासासाठी जोरकस प्रयत्नांची गरज आहे. 'व्हर्जिन डेस्टिनेशन'वर सुरक्षितता, सुविधा दिल्यास त्यांची प्रसिद्धी होऊन पर्यटकांचा ओघ वाढेल.
- अमाेल गोटे, सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग, नाशिक
पेठ तालुक्यातील बिलकस व्हॅली, बाऱ्हेजवळील भिवतास धबधबा असे जिल्ह्यात अनेक 'व्हर्जिन डेस्टिनेशन्स' आहेत जे पावसाळी पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र होऊ शकतात. तिथे पायाभूत सुविधा तसेच पर्यटन विभागाचे रिसॉर्ट आदी उत्तम सुविधा दिल्यास नाशिक निसर्ग पर्यटनात सर्वाधिक पसंतीचे स्थळ म्हणून पुढे येऊ शकते.
जिल्ह्यात एकूण ६८ किल्ले असून, त्यातील बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाच्या प्राथमिक नामांकन यादीत स्थान मिळाले आहे. त्यांचे जतन, संवर्धन केल्यास नाशिक हे दुर्ग किल्ले, गड यांचे महत्त्वाचे ठिकाण म्हणून पर्यटकांचे आवडते स्थळ म्हणून विकसित होऊ शकते. शासनाच्या उदासीनतेमुळे किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे.