![Nashik Airport](http://media.assettype.com/pudharinews%2F2024-06%2Fac7f278c-b46f-4a0d-b8ad-1b2b859a3fde%2FScreen_Shot_2020_07_06_at_7_47_24_AM.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : २०२० मध्ये जेव्हा नाशिकच्या ओझर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यात आली, तेव्हा एक- दोन नव्हे तर तब्बल तीन विमान कंपन्यांनी सेवा सुरू केली. मात्र, काही काळातच अचानक या कंपन्यांनी सेवा बंद केल्याने, नाशिकची विमानसेवा पूर्णत: कोलमडली होती. अशात इंडिगो कंपनीने पुढे येत नाशिकच्या विमानसेवेला बळ देण्याचा प्रयत्न केला. सद्यस्थितीत इंडिगोकडून देशातील प्रमुख सहा शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू आहे. दरम्यान, आणखी दोन कंपन्या नाशिकच्या विमानतळावरून आपली सेवा सुरू करण्यास इच्छुक असल्याने, नाशिकच्या विमानसेवेला बळ मिळण्याची शक्यता आहे. वर्षाअखेरपर्यंत या सेवा सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इंडिगोकडून देशातील प्रमुख सहा शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू आहे.
दोन कंपन्या नाशिकच्या विमानतळावरून आपली सेवा सुरू करण्यास इच्छुक आहे.
नाशिकच्या विमानतळावरून तीन कंपन्यांची सेवा सुरू होणार असून, देशातील आणखी मोठे शहरे नाशिकला थेट जोडली जाणार आहेत.
नाशिकच्या विमानतळावरून सेवा सुरू करण्यासाठी प्रारंभी स्पाइस जेट, इंडिगो, इण्डेन, स्टार एअर, एअर अलायन्स या कंपन्यांशी करार करण्यात आला होता. प्रत्यक्षात यातील स्पाइस जेट, स्टार एअर आणि एअर अलायन्स या तीनच कंपन्यांनी आपली सेवा सुरू केली होती. त्यावेळी दिल्ली, भोपाळ, बंगळुरू, हैदराबाद, गोवा, अहमदाबाद, बेळगाव, सिंधुदुर्ग या शहरांना जोडणारी सेवा या कंपन्यांकडून नियमित दिली जात होती. मात्र, अचानक ठराविक अंतरांनी या तिन्ही कंपन्यांनी आपली सेवा बंद केल्याने, नाशिकची विमानसेवा पूर्णत: कोलमडली होती. अशात इंडिगो कंपनीने पुढे येत नाशिकच्या विमानतळावरून सहा शहरांना जोडणारी नियमित सेवा सुरू केली आहे. आता आणखी दोन कंपन्या सेवा सुरू करण्यास उत्सुक असल्याने, नाशिकच्या विमानसेवेला बळ मिळण्याची शक्यता आहे. या दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा झाली असून, वर्षाअखेरपर्यंत विमानसेवा सुरू करण्याचा कंपन्यांचा मानस आहे. असे झाल्यास, नाशिकच्या विमानतळावरून तीन कंपन्यांची सेवा सुरू होणार असून, देशातील आणखी मोठे शहरे नाशिकला थेट जोडली जाणार आहेत.
नाशिकच्या विमानसेवेत सातत्य नसल्याचे प्रमुख कारण हेवीवेट राजकीय नेतृत्वाची उणीव असल्याचे व्यापारी, उद्योजकांकडून बोलले जाते. नाशिकच्या विमानसेवेसाठी उद्योजकांकडून प्रयत्न केले जात असून, निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबरच्या एव्हीशन कमिटी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कमिटीच्या पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने एअर कंपन्यांच्या व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करून सेवा सुरू करण्याचा आग्रह धरला जात आहे. या दोन कंपन्यांशीदेखील एव्हीशन कमिटीच्या पदाधिकाऱ्यांकडून संवाद सुरू आहे.
गेल्या १ मेपासून इंडिगोने नाशिक-दिल्ली थेट विमानसेवा सुरू केल्यानंतर १० सप्टेंबरपासून नाशिक-बंगळुरू विमानसेवा सुरू केली जाणार आहे. दरम्यान, विमानसेवेमुळे नाशिकच्या धार्मिक पर्यटनासह, उद्योगांसाठी कच्चा माल, केंद्रीय मंत्री, सचिव व अन्य अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, व्यवसायवृद्धी, काॅर्पोरेट बैठका, आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीसाठी या सेवा फायदेशीर ठरत आहेत.