देवळाली कॅम्प : सुधाकर गोडसे यंदा मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने नाशिक तालुक्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामातील दुबार पेरणीचे संकट टळले असून, जोरदार पावसामुळे खरीप पिकांसह आगामी रब्बी हंगामही यशस्वी होण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची सुरुवात काहीशी संथ होती. मात्र, जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चित्र पालटले. सध्या पाऊस ठाण मांडून असून, अद्याप दोन महिने पावसाचे शिल्लक आहेत. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, त्याचा थेट परिणाम भूजलपातळीवर झाला आहे.
खरिपाची ९५ टक्के लागवड प्रक्रिया पूर्ण
तालुक्यात यंदा सोयाबीन, मका, भात, ऊन्स, द्राक्ष, भाजीपाला आणि कडधान्यांची २५ टक्क्यांपर्यंत लागवड पूर्ण झाली आहे. पावसाच्या जोरावर अवघ्या आठवडद्यातच पिके डौलदार दिसू लागली आहेत. मात्र, मध्यंतरी पावसाने उघडीप न दिल्याने आणि सूर्यप्रकाशाअभावी काही पिकांची वाढ खुंटली आहे. सद्यस्थितीत सोयाचीन व कडधान्यांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
भूजल वाढले, नद्या तुडुंब
दारणा, गोदावरी, आळंदी, वालदेवी या नद्या भरभरून वाहत आहेत. नद्या, धरणे आणि के. टी. वेअर ओसंडून वाहत असल्याने यंदा पाणीटंचाई भासणार नाही. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत राहिल्यास रूबी हंगाम बळीराजासाठी सुगीचा ठरणार आहे.
कृषी विभागाचे मत : निचरा करा
तालुका कृषी अधिकारी जगदीश तुंबारे म्हणाले, "खरिपाची स्थिती समाधानकारक आहे. जास्त पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी निचरा करावा. अळी नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून मार्गदर्शन सुरू आहे. थंडी वाढल्यास ख्बी पिकांना फायदा होईल.
भाव स्थिर, आवक वाढण्याची शक्यता
नाशिक बाजार समितीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सोयाबीनला ४२०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल, मक्याला २२०० ते २४०० रुपये, तर भाताला ३००० ते ३५०० रुपये असा भाव मिळत आहे. पावसामुळे उत्पादन वाढल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बाजारात आवक वाढून भाव काहीसे स्थिरायू शकतात. मात्र, द्राक्ष आणि भाजीपाल्याला मागणी चांगली राहिल्याने दर टिकून राहण्याची शक्यता आहे.
छाटणीला पाणी; शेतकरीवर्ग समाधानी
शेवगेदारणा येथील शेतकरी शरद कासार म्हणाले, "गेल्या वर्षी पावसाने तोंडावर पाणी आणले होते. यंदा वेळेत पाऊस झाल्याने सोयाबीन आणि भात जोमात आहे. विहिरीही पहिल्यांदाच ऑगस्टमध्येच भरल्या." दुगाव येथील द्राक्ष बागायतदार रंगनाथ थेटे यांच्या मते, "पावसामुळे भूजल वाढले आहे. ऑक्टोबरमध्ये छाटणीला मुबलक पाणी मिळणार आहे. फक्त अळीचा बंदोबस्त झाला पाहिजे."