

राज्यात गत तीन वर्षांपासून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे धक्कादायक वास्तव राज्य शासनाच्याच अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे महिलांवरील अत्याचार, अपहरण, विवाहितांचा छळ, विनयभंग, मारहाणीसारखे प्रकार वाढत असून, राज्यात 'ती' असुरक्षित असल्याची भावनाही वाढत असल्याचे चित्र आहे. (Violence against women)
एकीकडे राज्य शासन महिलांना आर्थिक-सामाजिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी अनेक योजना आणत आहेत. शैक्षणिक, राेजगाराच्या माध्यमातून स्त्रियांना सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. मात्र दुसरीकडे ओळखीतील व्यक्तींकडूनच महिलांवर सर्वाधिक अत्याचार, छळ होत असल्याचेही वास्तव समोर आले आहे. राज्य शासनाच्या अहवालानुसार २०२१-२२ मध्ये प्रती एक लाख महिलांमागे ६६ महिलांवर शारीरिक, मानसिक स्वरूपाचे अत्याचार झाले. तर २०२२-२३ मध्ये हेच प्रमाण ७६ इतके झाले. अत्याचारांमुळे महिला प्रभावित होत असून, त्याचा फटका अप्रत्यक्षरीत्या कुटुंब व्यवस्थेतही बसत आहे. नातेसंबंधातील व्यक्ती, ओळखीच्या व्यक्तींनीच सर्वाधिक महिलांवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नात्यांमधील विश्वासालाही अत्याचारांच्या घटनांनी तडा जात असल्याचे चित्र आहे.
नाशिक शहरातही महिला अत्याचारात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याचे चित्र आहे. जानेवारी ते जून २०२३ या कालावधीत शहरात विनयभंगाचे १००, बलात्काराचे ७०, अपहरणाचे १६२, विवाहितांचा छळ ५६ असे एकूण ३८८ गुन्हे दाखल होते. तर चालू वर्षात जूनअखेरपर्यंत विनयभंगाचे १०६, बलात्काराचे ५५, अपहरणाचे १७५ व विवाहितांचा छळ केल्याप्रकरणी ७२ गुन्हे दाखल आहेत.
इतर गुन्हे -
2021-1499
2022-1255
2023-1312