

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर येथे २०० रुपयांचे तिकीट काढल्यास थेट दर्शन मिळेल, या आशेने आलेल्या भाविकांचा भ्रमनिरास होत आहे. तास-दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर रोकडअभावी रांगेतील क्रमांक गमवावा लागत असल्याने भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. देवस्थान संस्थान मात्र निर्विकारपणे पाहत आहे.
त्र्यंबकेश्वरला भाविकांना मंदिरापासून थेट उपजिल्हा रुग्णालय व त्याच्याही पुढे भाविक रांगेत उभे राहिलेले दिसतात. खासगी प्रवासी वाहनाने अथवा सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेतलेले भाविक उत्तर दरवाजाच्या समोर गर्दी करून उभे राहतात. येथून दर्शनाला जाता येत नाही हे समजल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असलेल्या परिसरात रांगेकडे धाव घेतात. तेथून ते रांगेच्या शेवटच्या टोकाकडे जातात. काही भाविक थेट या रांगेत उभे राहतात. मंदिर प्रांगणाच्या बाहेर साधारणतः दोन तास उभे राहून प्रवेशद्वारी पोहोचतात. त्यांनाही २०० रुपये तिकीट घेतलेल्या भाविकांची रांग असल्याचे समजते. त्यानंतर ते तिकिटाची शोधाशोध करत तिकीट खिडकी शिवप्रासाद इमारत, वाहनतळ आणि कुशावर्त चौक येथे असल्याचे समजते. चौकशी करत कसेबसे तेथे पोहोचले तर तिकिटासाठी लांबच लांब रांग लागलेली दिसते. तेथे उभे राहिल्यानंतर तिकीट तयार होण्यास काही व्यत्यय आला नाही तर खिडकीजवळ पोहोचल्यानंतर तेथे रोख रक्कम मागितली जाते. फोन पे, डिजिटल पेमेंट घेतले जात नसल्याने रोख पैसे नसलेल्या भाविकांची तेथे तारांबळ उडते.
तिकिटासाठी दोन तास आणि दर्शनासाठी तीन तास असा साधारणतः पाच तासांचा वेळ म्हणजेच पूर्ण दिवस घालवल्यानंतर गर्भगृहासमोर पोहोचताच धक्का देत काही सेकंदांत बाजूला केले जाते. २०० रुपये दर्शनवारीत काहीही सुविधा पुरविल्या जात नाहीत. दिवसभर त्रासात वेळ गेल्याने कधी एकदा येथून बाहेर पडतो आणि घराकडे जातो या भावनेने भाविक पुन्हा यायचे नाही, अशी मनोमन खुणगाठ बांधत गावाकडे जात असल्याची स्थिती आहे.
स्वच्छतागृहांची गरज
रांगेत उभे राहिलेल्या भाविकांसाठी त्र्यंबकमध्ये स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था नाही. सलग पाच ते सहा तास रांगेत उभे राहिल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर भाविक स्वच्छतागृह शोधताना दिसतात. देवस्थानने ही समस्या सोडविण्याची गरज आहे. पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृह उभारणे आवश्यक आहे. स्वच्छतागृहांअभावी बसस्थानक परिसरात कमालीची दुर्गंधी पसरलेली आहे.