

नाशिक : पहिल्या श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे. सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन सर्च ट्रेंड्समध्येही त्र्यंबकेश्वरसंदर्भातील भाविकांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी व वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
त्र्यंबकेश्वर शहरात रविवारी (दि. १६) व सोमवारी (दि.१७) मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांनी प्रशासनाने केलेल्या वाहतूकनियोजनास सहकार्य करून सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. पोलिस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित सर्व विभागांच्या माध्यमातून वाहतूक व भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.
भाविकांनी लेन कटिंग, राँगसाइडने वाहन चालविणे तसेच रस्त्याच्या कडेला वाहने उभी करणे टाळावे. प्रशासनाने निश्चित केलेल्या वाहतूक मार्गाचा व नियमांचा काटेकोरपणे अवलंब करावा. कुटुंबातील गर्भवती महिला, स्तनदा माता, गंभीर आजाराने त्रस्त व्यक्ती तसेच ५ वर्षे वयोगटातील लहान मुले असल्यास, त्यांनी रविवारी व सोमवारी त्र्यंबकेश्वर यात्रा करण्याचे शक्यतो टाळावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
परिसरात पावसाचे वातावरण असल्याने प्रत्येकाने पिण्याच्या पाण्याची बाटली व छत्री सोबत ठेवावी. विशेषतः लहान मुले क ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी, भाविकांची यात्रा सुखकर व सुरक्षित व्हावी, यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यास काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक भाविकाने संयम व खबरदारी बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी