नाशिक : भारतीय उद्योग क्षेत्राला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून देणारे रतन टाटा यांच्या निधनाने भारताची मोठी हानी झाली आहे. परोपकार, निःस्वार्थपणा, साधेपणा, सामाजिक बांधिलकी, नम्रपणा आदी गुणांचा मिलाप असलेले रतन टाटा देशातील उद्योग क्षेत्रासाठी आदर्श होते, अशा शब्दांत भावना व्यक्त करीत नाशिकच्या उद्योजकांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली.
नाशिक इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमातर्फे आयोजित श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी, नाशिकमध्ये टाटा समूहाचा प्रकल्प आणणे हीच रतन टाटा यांना खरी आदरांजली ठरेल, असे म्हटले. कोणत्याही उत्पादनाची निर्मिती करताना रतन टाटा यांनी गरीब आणि मध्यमवर्गीयांना केंद्रस्थानी मानले. एक लाखाची नॅनो कारची निर्मिती हे त्याचेच उदाहरण आहे. कोरोना काळात कामगारांची काळजी घेऊन त्यांनी आदर्श घालून दिलाा होता. टाटा म्हणजे विश्वासार्हता हा शब्द त्यांनी रुढ केला, असे सांगत मान्यवरांनी त्यांच्यासोबतचे अनुभव कथन केले. अनोळखी माणसाशी ते आपुलकीने बोलायचे. दुबई येथे गलो असता, रतन टाटा यांनी तासभर आमच्याशी गप्पा मारल्या होत्या, असा अनुभव उद्योजक जयप्रकाश जोशी यांनी सांगितला. यावेळी निपमचे अध्यक्ष राजाराम कासार, आयमाचे सरचिटणीस प्रमोद वाघ, कोषाध्यक्ष गोविंद झा, सचिव हर्षद बेळे, मनीष रावल, धीरज वडनेरे, राजेंद्र वडनेरे आदी उपस्थित होते.