

बोरगाव : पुढारी वृत्तसेवा
सुरगाणा तालुक्यात गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळित झाले. अनेक ठिकाणी लहान-मोठ्या पुलांवरून पाणी वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क काही काळ तुटला होता. तालुक्यात आतापर्यंत सरासरीच्या २८.३ टक्के पाऊस पडला आहे.
तालुक्यातील निंबारपाडा-खोकरी येथील मंगेश राजाराम बागूल हे नांगरणी करून शेतातून परत येत असताना पार नदीपात्रात त्यांचा ट्रॅक्टर अडकला. त्याचवेळी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे ट्रॅक्टर प्रवाहात वाहून गेला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे.
यात लाखो रुपयांची हानी झाली. पाणी ओसरल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरातील भीतीचे शेतकऱ्यांत वातावरण निर्माण झाले आहे.
पावसाळ्यात पूरग्रस्त नदी-नाल्यांमधून जीव धोक्यात घालून प्रवास करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे तालुक्यातील अनेक नदी-नाल्यांना पूर आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. काही ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत असल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी थांबावे लागले. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार रामजी राठोड यांनी केले आहे.