त्र्यंबकेश्वर : श्रावण महिन्याचा अखेरचा सोमवार आणि अमावस्येचा पर्वकाल साधण्यासाठी त्र्यंबकनगरीत सोमवती आमावास्याच्या (Shravan Somvati Amavasya) पूर्वसंध्येला रविवारी (दि. १) भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. मंदिराच्या उत्तर दरवाजा समोर भाविक गर्दी करत असून तेथूनच हात जोडत असल्याचे दिसत आहेत. कुशावर्तावर स्नानासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत शनिवारपासूनच (दि.31) वाढ झाली आहे.
पावसाने उघडीप दिल्याने भाविकांचा उत्साह दुणावला आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी आणि प्रदक्षिणेला जाणारे भाविक मोठ्या संख्येने आहेत. मागील सोमवारी जोरदार पाऊस असल्याने अनेकांन दर्शनासाठी येता आले नाही. त्यामुळे पाचव्या सोमवारचा योग साधण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. भगवान त्र्यंबकराजाला रुद्राभिषेक आदी पूजा करण्यासाठी भक्तांनी रविवारपासून केलेली गर्दी पाहाता श्रावणाचा अखेरचा सोमवार गजबजणार असल्याचे स्पष्ट होत आहे. असे असले तरी भाविकांना सेवा-सुविधांसाठी शासन यंत्रणांनी कोणतीही तसदी घेतलेली दिसत नाही. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पडलेले खड्डे, बस स्थानकाची दुरवस्था, शहरात सर्वत्र असलेली अस्वच्छता, अतिक्रमणांनी भक्तांना चालण्यास रस्ता नाही, शहरातील जागोजागी होणारे अनाधिकृत पार्कींग व त्यामुळे होणारी रहदारीची कोंडी थांबलेली नाही. रात्रीचे बंद असलेले पथदीप अनेक ठिकाणी अद्यापही सुरू झालेले नाही. त्यामुळे भाविकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.