दिंडोरी : राज्यातील महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार थांबवण्यासाठी महाराष्ट्रातील सरकार बदलायची आता वेळ आली आहे. बहिण- भावाच्या नात्याचे मोल लावणार्या सरकारला बहिण भावाचं प्रेम समजूच शकत नाही, अशी टिका करत जोपर्यंत महाराष्ट्राची तहाण भागणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा एक थेंबही पाणी इतरत्र जावू देणार नसल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले. दिंडोरी तालुक्यातील जऊळके-दिंडोरी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व बहुद्देशीय हॉल इमारत लोकार्पण सोहळा कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.
खा. सुळे म्हणाल्या की, लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्याने आज महाराष्ट्र सरकारला लाडकी बहिण आठवली. सगळ्या वस्तूंना टॅक्स लावत लाडकी बहिण योजना आणली. दाजींच्या खिशाला कात्री लावली आणि लाडकी बहिण योजना आणली. हे कितपत योग्य आहे? हे सरकार येणार्या विधानसभा निवडणुकीत घालवायचे आहे. कपटनितीने नाही तर लोकशाही पद्धतीने आपण सत्तेत येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भास्कर भगरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, सुनीता चारोस्कर, शहाजी सोमवंशी, दिंडोरी बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, उपसभापती योगेश बर्डे, दत्तू भेरे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा संगीता पाटील, मेघा धिंदळे, तालुकाध्यक्षा शैला उफाडे, भीमाबाई जोंधळे, संतोष रहेरे, नरेश देशमुख, विठ्ठलराव अपसुंदे, वसंत थेटे आदी उपस्थित होते.
खा. भगरे यांनी देखील मतदार संघातील द्राक्ष, कांदा आदी पिकांबरोबरच शेतीच्या समस्येवर प्रकाशझोत टाकला. कार्यक्रम यशस्वितेसाठी सरपंच भारती जोंंधळे, सदस्या अंबाबाई बागुल, भगवान गोतरणे, अरुणा वाघ, पोलिस पाटील श्रीधर गांगुर्डे, ग्रामसेवक हिरालाल पाटील, रावसाहेब जोंधळे, सोमनाथ बोरस्ते, निवृत्ती जोंधळे, कोंडाजी जोंधळे, दत्तू जोंधळे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक उपसरपंच तुकाराम जोंधळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण जोंधळे यांनी केले तर आभार शाम हिरे यांनी मानले.