

नाशिक : शेतकर्यांना शेती पीककर्ज वाटपासाठी नाबार्ड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून फेर कर्ज उपलब्ध करून देते. मात्र, गत चार वर्षांपासून नाशिक जिल्हा बँकेचा संचित तोटा व एनपीए मोठ्या प्रमाणात वाढल्याने राज्य बँकेकडून पीककर्जासाठी फेर कर्ज मिळालेले नाही.
जिल्हा बँकेची राज्य सहकारी बँक आता संस्थात्मक सल्लागार झाली आहे. त्यामुळे प्रशासक विद्याधर अनास्कर शेतकर्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी जिल्हा बँकेला सवलतीच्या दरात फेर कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी केली आहे.
शेतकर्यांची पीककर्जाची मागणी वाढली की, जिल्हा बँक ही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून फेर कर्ज घेऊन शेतकर्यांना पीककर्ज देत होती. साधारणत: दरवर्षी 500 ते 600 कोटींचे हे फेर कर्ज घेऊन शेतकर्यांना पीककर्ज देत होती. त्यासाठी जिल्हा बँक एक टक्का तोटा सहन करत होती. या फेर कर्जाची परतफेड नियमित होत असल्याने जिल्हा बँकेला हे कर्ज दरवर्षी मिळत होते. परंतु, बँक अडचणीत सापडल्याने राज्य सहकारी बँकेने फेर कर्ज देणेदेखील बंद केले आहे.
फेर कर्ज देऊन, ते परतफेड करण्याची तरतूद याबाबत अनास्कर ठोस निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे अनास्करांनी जिल्हा बँकेला फेर कर्जपुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा. या कामी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शासनातर्फे लक्ष घालून शेतकर्यांना पीककर्ज द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.