

नाशिक : नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. सिंहस्थांतर्गत विविध कामांवर सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हा निधी कुठे, कोणत्या कामांसाठी खर्च झाला, त्याचे ऑडिट केले जाणार असून, यासंदर्भातील अहवाल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधिमंडळात दिली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून सुमारे 10 कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. या भाविकांना विविध सोयी- सुविधा पुरविण्यासाठी नाशिक महापालिकेसह विविध शासकीय विभागांकडून एकूण २४ हजार कोटींचा सिंहस्थ आराखडा तयार करण्यात आला आहे. सिंहस्थासाठी आता जेमतेम दोन वर्षांचा कालावधी राहिला असताना अद्याप या आराखड्याला शासनाची मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे निधीअभावी सिंहस्थकामे सुरू झालेली नाही. यासंदर्भात साधू- महंतांकडून नाराजी व्यक्त झाल्यानंतर शासनाने पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर करताना सिंहस्थासाठी एक हजार कोटींची तरतूद केली आहे.
दरम्यान, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण स्थापनेबाबतचे विधेयक मांडले होते. त्यावर सभागृहात चर्चा करण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. एकनाथ खडसे, आ. सचिन अहिर, आ. सत्यजित तांबे यांनी विविध सूचना मांडल्या. त्यावर मंत्री सामंत यांनी सविस्तर उत्तर दिल्याने हे विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आले. कुंभमेळ्यास येणाऱ्या भाविकांसाठी सोयीसुविधांसाठी लागणारा खर्च तसेच त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी निविदा काढण्याचे अधिकार प्राधिकरणाच्या अध्यक्षांना देण्यात आले आहेत. मात्र, हा निधी कुठे वापरला याची सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा जनतेला माहिती दिली जाईल, अशी माहिती यावेळी मंत्री सामंत यांनी दिली.
जगातल्या सर्व उद्योजकांना कुंभमेळ्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी उद्योग विभागाकडून टेन्ट सिटी उभारण्यात येणार आहे. तसेच, ज्येष्ठ साहित्यिक, सेलिब्रिटी यांना व्यवस्थित दर्शन घेता येण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.