

नाशिक / मुंबई : सिंहस्थ कुंभमेळ्याचे उत्कृष्ट व प्रभावी नियोजन करावे. नाशिकमध्ये होऊ घातलेला कुंभमेळा पावसाळ्यात होत असल्याने विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता असून प्रशासनाने सर्व शक्यतांची पडताळणी करून कार्यवाही करावी, असे निर्देश कुंभमेळा मंत्री तथा मंत्री समितीचे प्रमुख गिरीश महाजन यांनी दिले. १२ वर्षांपूर्वीच्या कुंभमेळ्याचा अनुभव लक्षात घेता यावेळी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्याने त्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन राज्य शासनाच्या वतीने करण्यात येत असून या माध्यमातून नाशिकचा देशभरात लौकिक वाढेल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची आढावा बैठक मंत्रालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते. पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी नाशिक कुंभमेळ्याचे नियोजन करताना तीन टप्प्यांवर नियोजन करावे असे यावेळी सूचित केले. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्य शासनाच्या वतीने २०० नवीन बसेस महामंडळास उपलब्ध व्हाव्यात, या बसेस कुंभमेळ्यानंतर राज्यात उपयोगी पडतील, असे यावेळी सांगितले. पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी नाशिक विमानतळ परिसरात देश-परदेशातून येणाऱ्या अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी विशेष सुविधा तसेच इतर ठिकाणी देखील अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी जागा निश्चिती करण्याचे सुचित केले.
कुंभमेळा प्राधिकरणाचे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या तसेच इतर विभागांच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले. यावेळी मंत्री छगन भुजबळ, दादाजी भुसे, उदय सामंत, शिवेंद्रसिंह भोसले, ॲड. माणिकराव कोकाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभमेळा आयुक्त तथा सदस्य सचिव शेखर सिंग, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे जलज शर्मा, पोलीस विशेष महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शाश्वत विकास व्हावा: भुजबळ
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी रामकुंडावर होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले. ज्या सुविधा कुंभमेळ्याच्या निमित्ताने उपलब्ध होत आहेत त्या कायमस्वरूपी उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून नियोजन होणे आवश्यक असल्याचे यावेळी सूचित केले. तसेच गोदावरीमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्यावर देखील तातडीने कार्यवाही करून नदीपासून ते वेगळे करणे आवश्यक असल्याचे निर्देशित केले.
पर्यटनस्थळांचा विकास व्हावा: भुसे
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक येथे नव्याने रुग्णालय उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगून ज्या सुविधा उभारण्यात येत आहेत त्याचा वापर भविष्यात झाला पाहिजे. यासाठी प्रशासनाने नियोजन करावे, असे सूचित केले. तसेच नाशिक जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचा म्हणजेच सप्तशृंगी गड, सर्व तिर्थटाकेद, कपिलधारा तीर्थ कावनई, तपोवन, शुल्क तीर्थ राम मंदिर इगतपुरी यांसह इतर पर्यटन क्षेत्राचा देखील विकास या निमित्ताने व्हावा असे सूचित केले.
द्वारका-नाशिकरोड उड्डाणपुल उभारा: कोकाटे
क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी द्वारका ते नाशिक रोड उड्डाणपुलाबाबत प्रशासनाने तातडीने काम सुरू करावे. हे काम सुरू करताना जनतेला कोणतीही अडचण होणार नाही जनतेची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे सूचना केली. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील नाशिकमध्ये डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलन प्रसंगी नाशिक कुंभमेळ्याच्या अनुषंगाने ब्रँडिंग करण्याचे सूचित केले.