सिन्नर(जि. नाशिक) : तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे तीन शाळकरी मुलांना विहिरीत लोटून देऊन हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजळन घटना बुधवारी (दि. १८) सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. तथापि या घटनेत सुदैवाने तीनही मुलांचा जीव वाचला. याप्रकरणी दीपाली संतोष घुगे यांच्या फिर्यादीवरून अमोल रामनाथ लांडगे (३२), साईनाथ खमके (३०), विक्रम माळी (३२) या तीन संशयितांविरोधात गुरुवारी (दि. १९) सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरद संतोष घुगे (१३), अथर्व संतोष घुगे (९) व आदित्य योगेश सानप (१३) अशी या घटनेत बचावलेल्या तिन्ही मुलांची नावे आहेत. संशयित आरोपी अमोल लांडगे व घुगे यांच्या परिवारात कौटुंबिक वाद असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या रागातून अमोलने कट रचल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. गुरुवारी पोलिस ठाण्यात संशयितां विरोधात कट रचून तीन मुलांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक संजय गोसावी पुढील तपास करीत आहेत.
वरद, अथर्व व आदित्य हे गावापासून जवळच उभे असताना अमोल लांडगे त्यांच्याजवळ आला व विहिरीजवळ दोन माणसे उभे असून त्यांच्याकडे कासव आहे, ते घेऊन या, असे त्याने या तिघांना खोटे सांगितले. विहिरीजवळ संशयित साईनाथ खमके व विक्रम माळी हे उभे होते. त्यांनी या शाळकरी मुलांना कासव दिले तर नाहीच, पण पाण्यात लोटून देत हत्येचा प्रयत्न केला. पाण्यात पडल्यानंतर मुलांनी विद्युत मोटारीच्या बाजूला बांधलेल्या दोरांना पकडून ठेवले.
आदित्य सानप याने स्वतः सह वरद व अथर्व यांचा जीव वाचवला. रात्री ते घरी पोहोचले. तथापि अमोलने वरद व अधर्व यांना याबाबत घरी काहीही सांगू नका, असे बजावले. भीतीपोटी ते रात्री झोपी गेले. मात्र आदित्य सानपने याबाबत आई-वडिलांना माहिती दिली. सानप परिवाराने घुगे यांच्याशी संपर्क साधत घटनेबाबत शहानिशा केली. त्यानंतर पोलिसपाटील सागर मुठाळ यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर हा सगळा खळबळजनक प्रकार समोर आला.