

सातपूर : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बहुला गावात त्र्यंबक रोडलगत पुलाजवळ असलेली विनाकठड्याची विहीर पादचारी आणि वाहनचालकांसाठी धोकादायक ठरली आहे. या विहिरीभोवती कोणतीही सुरक्षा उपाययोजना नसल्यामुळे दिंडोरीसारखी दुर्घटना होण्याची भीती आहे.
दिंडोरीत गत शुक्रवारी विहिरीत कार पडून एकाच कुटुंबातील नऊ जणांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाही प्रशासनाने अद्याप या धोकादायक विहिरींकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. पिंपळगाव बहुला येथील रस्त्यालगतची ही विहीर उघडी आणि असुरक्षित असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ही विहीर पुलाजवळ आणि मुख्य रस्त्यालगत असल्याने लहान मुले, पादचारी तसेच वाहनधारकांसाठी धोकादायक आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था अपुरी असल्यामुळे त्यात वाहन पडून अपघाताची शक्यता आहे.
याबाबत अनेकदा तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नागरे यांनी सांगितले की, दिंडोरीसारखी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये यासाठी पिंपळगाव बहुला येथील ही धोकादायक विहीर तत्काळ बुजविणे किंवा सुरक्षित करणे अत्यावश्यक आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.