

दिंडोरी : गावागावांतील ग्रामपंचायती सक्षम व समृद्ध झाल्या तरच खर्या अर्थाने राज्याचा विकास साध्य होईल. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामीण भागातील शासकीय सेवा बळकट करण्यासाठी आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाइट अद्ययावत करणे, योजनांची पारदर्शक अंमलबजावणी करणे आणि लोकसहभागातून कामे उभी करणे हे आपले सामूहिक ध्येय असले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले.
पवार यांनी दिंडोरी पंचायत समितीला भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा सविस्तर आढावा घेतला तालुकास्तरीय कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत स्वनिधी व लोकवर्गणीच्या माध्यमातून आर्थिक सक्षम पंचायत उभारणे, स्वच्छता व जलसंवर्धनावर भर देणे, हरित व ऊर्जा-बचत उपाययोजना राबवणे, तसेच सुशासनयुक्त पंचायत घडवणे हे अभियानाचे मूळ उद्दिष्ट आहे. या कामांसाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक नागरिकाला सहभागी करून घ्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी खडक सुकेणे येथील ग्रामपंचायत अधिकारी मनोहर गांगुर्डे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायत वेबसाइटचे सादरीकरण केले. यावेळी इतर ग्रामपंचायतींनीदेखील आदर्श घेत आपले लोकाभिमुख संकेतस्थळ निर्माण करावे, असेही गांगुर्डे म्हणाले. या वेबसाइटच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावरील सर्व शासकीय सुविधांचे डिजिटलायझेशन करण्यात आल्याने ओमकार पवार यांनी कौतुक केले.
या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे, सहायक गटविकास अधिकारी भरत वेंदे यांच्यासह तालुकास्तरावरील विभागप्रमुख अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. डॉ. अर्जुन गुंडे यांनी अधिकार्यांना मार्गदर्शन केले. प्रतिभा संगमनेरे यांनी अभियानातील उद्दिष्टपूर्तीकडे लक्ष वेधले.
स्वयंसहायता समूह प्रकल्पांना भेट
वनारवाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील नवनाथ महिला स्वयंसहायता समूहाच्या मशरूमनिर्मिती प्रकल्पालाही ओमकार पवार यांनी भेट देत मशरूमनिर्मिती प्रक्रियेची माहिती घेतली. तसेच ढकांबे ग्रामपंचायत येथील सर्वज्ञ महिला स्वयंसहायता समूहाच्या कारली व बटाटा वेफसनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन केले. महिला बचतगटांनी राबविलेल्या उद्योगांना प्रशासन व समाजाने बळ दिले, तर हे उपक्रम ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला नवा चेहरा देतील, असे प्रतिपादन पवार यांनी यावेळी केले.
प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी
मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दौर्यादरम्यान तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन औषधसाठा, लसीकरण कक्षाची कार्यपद्धती व रुग्णांना दिल्या जाणार्या सेवा यांची पाहणी केली. त्याचबरोबर स्वस्थ नारी, निरोगी परिवार उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतनिहाय लसीकरण करावे, अशा सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी दिल्या.