

पंचवटी : शहरात रस्त्यातील खड्ड्यांमुळे घडणाऱ्या अपघाताची मालिका सुरू असून अशीच आणखी एक अपघाताची घटना मेरी रासबिहारी लिंक रोडवर घडली असून शुक्रवारी (दि.२६) रिक्षाचालकाचा खड्डा वाचविण्याच्या नादात अपघात झाला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासणी केली असता त्यास मृत घोषित केले.
रस्त्यातील खड्ड्याने पुन्हा एकदा एक जीव घेतला असून प्रशासनान अजून किती बळी घेणार ? व त्यास केव्हा जाग जाग येणार असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंचवटीतील इंद्रकुंड येथील सुनील नथु अहिरे (वय ५५) हे पत्नी, दोन मुलांसमवेत वास्तव्यास होते. उदरनिर्वाहासाठी ते रिक्षा चालवत होता. शुक्रवार (दि.२६) रोजी सुनील रिक्षा चालवत बळी मंदिरकडून मेरी - रासबिहारी लिंक रोड मार्गे आर टी ओ कॉर्नरकडे चालले होते. राजमाता मंगल कार्यालयासमोर खड्डा वाचविताना रिक्षाचा अपघात झाला. यात रिक्षा पलटी झाल्याने चालक गंभीर जखमी झाले. तेथील नागरिकांनी धाव घेत जखमीस तातडीने उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.