

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा २०२६ चीरी-परीक्षा रविवारी (दि. २१) नाशिकमधील विविध परीक्षा केंद्रांवर शांततेत पार पडली. देशभरात आयोजित या परीक्षेसाठी नाशिक केंद्रावर विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. एकूण ११ हजार १६२ नोंदणीकृत उमेदवारांपैकी १० हजार २९ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते.
१ हजार १३३ विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याने नाशिक केंद्रावरील उपस्थितीचे प्रमाण ८९.८५ टक्के नोंदवण्यात आले. दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत परीक्षा पार पडली. परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची बायोमेट्रिक पडताळणी, ओळखपत्रांची तपासणी आणि प्रवेशप्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. गैरप्रकार घडू नये यासाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा कार्यरत होती.
नीट परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी शहर पोलिस प्रशासनाने विशेष सुरक्षाव्यवस्था उभारली होती. शहरातील १७ परीक्षा केंद्रांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रत्येक केंद्रावर एक पोलिस अधिकारी व सात अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली होती.
याशिवाय सुरक्षाव्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी एक वरिष्ठ पोलिस अधिकारी व १० अंमलदारांचा अतिरिक्त बंदोबस्त देण्यात आला. परीक्षेच्या संपूर्ण नियोजनासाठी पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
त्यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षाव्यवस्था, वाहतूक नियोजन, उमेदवारांची सुरक्षितता आणि परीक्षा प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. परीक्षेपूर्वी शनिवारी पोलिस प्रशासनाने १७परीक्षा केंद्रांची पाहणी केली होती. केंद्रांवरील प्रवेशद्वारे, सुरक्षाव्यवस्था, वाहतूक नियंत्रण तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
काही केंद्रांवर रंगीत तालीमदेखील घेण्यात आली होती. वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी महत्त्वाची मानली जाणारी ही परीक्षा कोणत्याही अडथळ्याविना आणि शांततेत पार पडल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले.
केटीएचएम केंद्रांवर चोख व्यवस्था
नीट २०२६ परीक्षा सुरळीत व गैरप्रकारमुक्त पार पडावी यासाठी सरकारवाडा पोलिस ठाण्याकडून केटीएचएम महाविद्यालय परिसरातील चार परीक्षा केंद्रांवर विशेष सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. या केंद्रांवर सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मागील वर्षी देशभरात नीट पेपरफुटी प्रकरण गाजल्याने यंदा प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली.
सरकारवाडा ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड हे परीक्षा सुरू होण्याच्या एक तास अगोदरपासून परीक्षा संपेपर्यंत स्वतः पोलिस पथकासह केंद्रांवर उपस्थित होते. शहरातील १७ केंद्रांपैकी चार केंद्रे केटीएचएम परिसरात असल्याने या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला होता.