नाशिक : लाडक्या गणरायाच्या आगमनासोबत नाशिकमध्ये वरुणराजाने हजेरी लावली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने गंगापूर व गौतमी गोदावरी धरणासह तब्बल १७ धरणांमधून विसर्ग केला जात आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे.
जिल्ह्यातील १७ धरणांमधून विसर्ग
पावसाचा जोर वाढल्यास विसर्गात वाढ
नाशिक शहर व परिसरात शनिवारी (दि. ७) पहाटे काहीकाळ पावसाने हजेरी लावली. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास पंधरा ते वीस मिनिटे हलक्या सरी बरसल्या. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही ठिकठिकाणी अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने धरणाच्या विसर्गात ३३९२ क्युसेकपर्यंत वाढ करण्यात आली. तर गौतमी गोदावरीमधून सकाळी १० ला ५०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू केला गेला. याशिवाय दारणामधून २८७८ तर पालखेडमधून २५५६ क्युसेक वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील चोवीसपैकी तब्बल १७ धरणांमधून पाण्याचा विसर्ग कायम आहे. दरम्यान, विभागाने सोमवारपर्यत (दि. ९) जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे. याकाळात घाटमाथा परिसरात जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे. तसेच अन्य भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आजपर्यंत सरासरी ७८४ मिमी पर्जन्याची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ८४ टक्के आहे.