नाशिक : शहर व परिसरात रविवारी (दि. २२) परतीच्या पावसाने हजेरी लावली. साधारणत: पाऊण तास झालेल्या पावसाने हवेत काही काळ गारवा निर्माण झाला. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला. जिल्ह्यात पुढचे चार दिवस पावसाचे असणार असून, हवामान विभागाकडून गुरुवारी (दि.२६) ऑरेंज अलर्ट दिला आहे.
तब्बल आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर शहरात पावसाचे आगमन झाले. सकाळपासून हवेत उष्मा जाणवत असताना दुपारी अडीच ते पावणेतीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे ४५ मिनिटे मध्यम ते जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाली. तर अचानक आलेल्या पावसाने रस्त्यावरील छोट्या-मोठ्या विक्रेत्यांना फटका बसला. शहरात २.२ मिमी पर्जन्याची नोंद करण्यात आली.
दुसरीकडे जिल्ह्यातही ठिकठिकाणी दिवसभरात हलक्या ते मध्यम सरी पडल्या. तूर्तास पावसाचा जोर नसला तरी पाच धरणांमधून पाण्याचा विसर्ग कायम आहे. त्यामध्ये 'दारणा'तून एक हजार क्यूसेक वेगाने नदीपात्रात पाणी साेडण्यात येत आहे. याशिवाय भाममधून २०, वालदेवी १५, आळंदी ३०, तर वाघाडमधून १७८ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार बुधवार (दि. २५) पर्यंत जिल्ह्याच्या निरनिराळ्या भागांत हलक्या स्वरूपाचा, तर घाटमाथा परिसरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच गुरुवारी (दि.2६) संपूर्ण जिल्ह्याकरिता पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.