नाशिक : सलग तीन दिवसांपासून हजेरी लावणाऱ्या पावसाने सोमवारी (दि. १६) विश्रांती घेतली. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये आनंद पसरला. हवामान विभागाच्या अंंदाजानुसार पुढचे चार दिवस पाऊस उसंत घेणार असल्याने गणेश विसर्जन सोहळ्यावरील विघ्न टळले आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवड्याच्या प्रारंभी उघडीप देणाऱ्या पावसाचा जोर शुक्रवार (दि. १३) पासून वाढला. शहर व परिसरात हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. त्याने ग्रामीण भागातही ठिकठिकाणी हजेरी लावली. गणेशोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात हजेरी लावणाऱ्या पावसाने गणेशभक्तांची कोंडी केली होती. परंतु, जिल्ह्यात सोमवारी उघडीप दिली. त्यामुळे भक्तांच्या आनंद द्विगुणित झाला आहे. दरम्यान, राज्यात सध्या विदर्भ वगळता अन्यत्र पावसाने विश्रांती घेतली आहे. येत्या शुक्रवारनंतर नाशिक, नगरसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरी 800 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत ८६ टक्के इतके आहे.