नाशिक : पुणे घाटमाथा, सातारा आणि पालघरला रविवारी (दि. ४ ऑगस्ट) अतिवृष्टीचा रेड अलर्ट, तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
नैर्ऋत्य बिहार, वायव्य झारखंड आणि राजस्थानावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच पश्चिम किनारपट्टीवरही कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार (६४.५ ते ११५.५ मि.मी. ते अतिमुसळधार ११५ ते २०४.५ मि.मी.) इतक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. प्रामुख्याने कोकण व घाटमाथ्यावर अतिवृष्टी म्हणजे ११५ ते २०४.५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पालघर, पुणे व सातारा घाटमाथ्याला रेड अलर्ट दिला आहे.
राज्यात आगामी ४८ तास महत्त्वाचे असून, सावधान राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर जास्त राहणार आहे. मराठवाड्यातील काही भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल.