

नाशिक : मनमाड-इंदूर नवीन रेल्वे लाईन प्रकल्पाला अखेर गती मिळताना दिसत आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यासाठी नाशिकचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी काळात नांदगावमधील सहा तर मालेगावमधील 15 गावांचे भुसंपादन करण्यात येणार आहे, त्यामुळे हा प्रकल्प आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे.
रेल्वे अधिनियम 1989 (1989 चा 24) व त्यातील 2008 च्या सुधारित तरतुदींनुसार आगामी काळात मनमाड ते नवीन धुळे व नरडाणा ते डॉ. आंबेडकर नगर या दरम्यान 309.43 किमी लांबीच्या नवीन रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानूसार नांदगाव तालुक्यातील मनमाड, अस्तगाव, पांझणदेव, खाटगाव, नवसारी व भाडी अशा एकूण सहा तर मालेगाव तालुक्यातील चोंढी, जळगाव, काळेवाडी, घोडेगाव चौकी, वर्हाणे, मेहुण, ज्वार्डी बु., येसगाव, सवंदगाव, सायणे बु. माल्हाणगाव, चिखलओहोळ, झोडगे आदी गावांचे भुसंपादन करण्यात येणार आहे.
प्रकल्पासाठी भूसंपादन प्राधिकृत अधिकारी नियुक्त करण्याची विनंती उपमुख्य अभियंता (निर्माण), मध्य रेल्वे, भुसावळ यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना केली होती. त्यानुसार उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), वैद्यकीय जिल्हा प्रकल्प यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काळात संबंधित गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया गतिमान करण्यात येणार आहे. सध्या प्रकल्पाचे मध्यप्रदेशातील काम पूर्णत्वाच्या जवळ पोहोचले आहे. तर महाराष्ट्रातील धुळे व मालेगाव तालुक्यातील भू-अधिग्रहण प्रक्रियेला आता गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला मनमाड- इंदूर रेल्वेमार्ग आता खर्या अर्थाने दृष्टीपथात येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी प्रयत्नशील असलेल्या खासदार डॉ. शरद बच्छाव यांनी या प्रकल्पासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन प्रकल्पाला गती देण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच या प्रकल्पाला आता प्रशासकीय स्तरावर मंजूरी मिळाल्याचे दिसून येते.