राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (National Health Mission, Government programme) नागरी क्षेत्रात महापालिकांच्या माध्यमातून पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा- सुविधांचा मूल्यमापन अहवाल आरोग्यसेवा आयुक्तालयातर्फे जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांना आरोग्य- वैद्यकीय सेवा पुरविण्यात राज्यात नवी मुंबईने पहिला, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने दुसरा क्रमांक पटकावला. 'सुंदर नाशिक, स्वच्छ नाशिक'ची बिरुदावली मिरवणाऱ्या नाशिक महापालिकेची मात्र या अभियानात घसरण झाली असून, गेल्या डिसेंबरमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या नाशिकची 18 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
राज्यातील पहिल्या पाच महापालिका
गुणानुक्रम - महापालिका- (कंसात मिळालेले गुण- टक्केवारी)
नवी मुंबई (३८.५७)
पिंपरी चिंचवड (३८.२७)
सांगली (३७.५४)
पुणे (३४.७३)
धुळे (३४.६९)
राज्यातील शेवटच्या पाच महापालिका
चंद्रपूर (२५.८०)
अहमदनगर (२५.६८)
लातूर (२३.७५)
जळगाव (२२.३६)
बृहन्मुंबई (२१.९३)
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माता व बाल आरोग्य कार्यक्रम, कुटुंब कल्याण कार्यक्रम, नियमित लसीकरण, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम, एनपीसीडीसीएस, डेंग्यूसह साथरोग नियंत्रण, एनयूएचएम अशा विविध आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. या उपक्रमांच्या माध्यमातून रुग्णांसह, गरजूंना आरोग्यसेवा पुरविली जाते. या सेवा नागरिकांपर्यंत पोहोचतात किंवा नाही, यातील कोणत्या सेवा महापालिकांच्या माध्यमातून नागरिकांना अधिकाधिक देण्यात आल्या, कोणत्या सेवा देण्यात महापालिका अपयशी ठरल्या, याचे मूल्यमापन आरोग्यसेवा विभागामार्फत दरमहा केले जाते. त्यात रुग्णालय, आरोग्यवर्धिनी, रुग्ण कल्याण समितीच्या कार्याचेही मूल्यमापन करण्यात येते.
या मूल्यमापनाद्वारे राज्यातील २७ महापालिकांचे रँकिंग करून जबाबदारी निश्चित केली जाते. नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा पुरविणाऱ्या महापालिकांचा शासनातर्फे गौरव केला जातो, तर आरोग्यसेवा पुरविण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकांना 'समज' देत कानउघाडणीही केली जाते. जून महिन्यातील मूल्यमापन अहवाल राज्याच्या आरोग्यसेवा विभागामार्फत जाहीर करण्यात आला असून, त्यात नाशिक महापालिकेची १८ व्या स्थानावर घसरण झाल्याचे समोर आले आहे.
राज्यात नवी मुंबई पहिल्या, तर पिंपरी चिंचवड दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या काही महिन्यांपासून नाशिक महापालिकेची कामगिरी असमाधानकारक असल्याचे अहलातून दिसत असल्यामुळे आरोग्यसेवांची अंमलबजावणी अधिक तत्परतेने करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्यसेवांचे मूल्यमापन करताना ४०० गुण निश्चित करण्यात आले असून, त्यानुसार परीक्षण करण्यात येते. आरोग्यसेवांच्या अंमलबजावणीत नाशिक महापालिकेला ४०० पैकी जेमतेम १०५ अर्थात २६.३० टक्के गुण मिळाले आहेत. डिसेंबरमध्ये याच मूल्यमापनात नाशिक महापालिका पाचव्या स्थानावर होती. महापालिकेला ३१.१४ गुण मिळाले होते. यंदा राज्यातील २७ महापालिकांमध्ये नाशिक १८ व्या स्थानी आहे.
कुटुंबनियोजन, गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी, आरसीएच पोर्टल, रेबिज कंट्रोल प्रोग्राम, एनएलईपी, एनसीडी, एनटीसीपी, एनयूएचएम, एड्स नियंत्रण कार्यक्रम आदी आरोग्यसेवांमध्ये महापालिकेची कामगिरी सुमार दर्जाची असल्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मूल्यमापन रँकिंगमध्ये घसरण झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य-वैद्यकीय विभागाने या आरोग्यसेवांच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या आरोग्यसेवांच्या अंमलबजावणीत चंद्रपूर, अहमदनगर, लातूर, जळगाव व बृहन्मुंबई महापालिकांची कामगिरी सातत्याने असमाधानकारक राहिली आहे. त्यामुळे आरोग्यसेवा संचालकांनी या महापालिकांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. आरोग्यविषयक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचे काम असमाधानकारक असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा वेळोवेळी आढावा घ्यावा. कामात सुधारणा करावी, अशा सूचना आरोग्य सेवा संचालकांनी महापालिकांच्या मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी महापालिकेच्या आरोग्य-वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून काटेकोर केली जाईल. नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा- सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न केले जातील. आगामी काळात नाशिक महापालिकेच्या कामगिरीत सुधारणा होईल.
डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका, नाशिक.