

येवला (नाशिक) : पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध होण्यासाठी योग्य नियोजन करा तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून प्रस्ताव शासनास सादर करावे अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
मंत्री भुजबळ यांनी रविवारी (दि.15) येवला येथील संपर्क कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत विविध विकासकामांबाबत तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभाध्यक्ष वसंत पवार, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हुसेन शेख आदी उपस्थित होते.
मंत्री भुजबळ म्हणाले की, येवला शहर व तालुक्यात कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी तातडीने पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव शासनाला सादर करावे. वीज पडून तसेच अतिवृष्टीमुळे जीवितहानी व वित्तहानी झालेल्यांचे पंचनामे करून मदत उपलब्ध करून द्यावी. काही भागांत टंचाई असल्याने तेथे नियमित पाणीपुरवठा करावा. १ जुलैनंतरही टँकरची आवश्यकता लागल्यास प्रस्ताव स्वीकारावे. येवला साठवण तलावात पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून, शहरात नियमित पाणीपुरवठा करण्याचीही सूचना त्यांनी केली. तसेच तालुक्यात शासनाकडून २५० क्विंटल बियाणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या बियाणाचे वाटप लाभार्थ्यांना योग्यरीत्या झाले पाहिजे. खतांचा पुरवठा मुबलक प्रमाणात झाला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुणेगाव- दरसवाडी- डोंगरगाव पोहोच कालव्याचे टप्पा १ व टप्पा २ अंतर्गत अस्तरीकरण करण्यात येत आहे. या कामाचा आढावा यावेळी भुजबळ यांनी घेतला. अस्तरीकरणासाठी आवश्यक त्या ठिकाणी पोलिस सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही मंत्री भुजबळ यांनी केल्या. अस्तरीकरणाचे काम ३० जूनपर्यंत काम पूर्ण होईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली.