Online Game : व्यसन ! 'मी पाच वर्षांपूर्वीच मरण पावलो आहे...' नाशिकमध्ये ऑनलाइन गेमचा दुसरा बळी
येवला (नाशिक) : 'मी पाच वर्षांपूर्वीच मरण पावलो आहे, फक्त शरीर जिवंत आहे...' अशी चिठ्ठी लिहून तालुक्यातील देवळाणे येथील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडकीस आली आहे. यशराज रवींद्र बोर्डे (१८) असे मृत तरुणाचे नाव आहे. यशराज तीन दिवसांपासून बेपत्ता होता. पोलिस शोध घेत असताना गुरुवारी (दि. २१) सकाळी शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळला.
यशराजने आपल्या वहीत 'मी पाच वर्षांपूर्वीच मरण पावलो आहे, फक्त शरीर जिवंत आहे...' अशा शब्दांत आपली व्यथा मांडली आहे. त्यामुळे तो मानसिक तणावात असल्याचे समोर येत आहे. याबाबत बोलताना त्याचे काका भास्कर बोर्डे यांनी चिठ्ठीचा उल्लेख करून त्याला मोबाइल गेमचे व्यसन असल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी सांगितले की, मोबाइल गेममुळेच आत्महत्या घडली असे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

