लासलगाव : लासलगाव बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव 4700 रुपयांपर्यंत गेल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असताना केंद्र सरकारने भावाला लगाम घालण्यासाठी पुन्हा पाऊल उचलले आहे. नाफेड, एनसीसीएफमार्फत खरेदी केलेला पाच लाख मेट्रिक टन कांदा बाजारात आणल्याने शेतकरी संघटनेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. (The central government has again taken steps to rein in onion prices)
कांदा उत्पादकांना अच्छे दिन आले असताना केंद्र सरकारने नाफेड, एनसीसीएफचा कांदा खुल्या बाजारात आणू नये. आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा. अन्यथा विधानसभा निवडणुकीतसुद्धा कांदा उत्पादक शेतकरी आपला संताप व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही.
सुनील गवळी, कांदा उत्पादक शेतकरी, ब्राह्मणगाव, विंचूर, नाशिक.
लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख कांद्यांच्या बाजार समित्यांमध्ये गेल्या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव चार हजार रुपयांच्या जवळपास गेल्यानंतर केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने 30 ऑगस्ट रोजी अध्यादेश काढत खरेदी केलेल्या पाच लाख मॅट्रिक टन कांद्यापैकी मोठ्या प्रमाणात कांदा हा देशांतर्गत उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. नाशिक जिल्ह्यात नाफेड, एनसीसीएफच्या गोदामात साठवलेला कांदा प्रतवारी करत गोण्यांमध्ये भरला जात आहे. देशांतर्गत मागणी असलेल्या ठिकाणांवर पोच केला जाणार आहे.
ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब होत असल्याने कांद्याच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. केंद्र सरकारने खुल्या बाजारात कांदा पुरवठा वाढविल्याने कांद्याच्या बाजारभावावर याचा परिणाम झाल्यास याची किंमत महायुतीतील घटक पक्षांना लोकसभेप्रमाणे विधानसभेतही मोजावी लागणार आहे.
केदारनाथ नवले, युवा जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, नाशिक