

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात पावसाचे आगमन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शासनाने पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पर्जन्यमान यंत्र बसविण्याचे आदेश दिले असले, तरी उत्तर महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांमध्ये तब्बल ५५ मंडळांमध्ये स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रे अद्याप बसविण्यात आलेली नाहीत.
एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस झाला, तर शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होते. वित्तहानीबरोबरच मानव व पशुहानीदेखील होते. त्यासाठी पर्जन्यमानाच्या अचूक अहवालाची नितांत गरज असते.
महसूल व कृषी प्रशासनासाठी पर्जन्यमापक यंत्रांद्वारे मंडळनिहाय पावसाची नोंद घेतली जाते. त्यावरून दुष्काळ, अतिवृष्टी, पीक नुकसान, विमा दावे तसेच विविध शासकीय योजनांचे निर्णय घेतले जातात. उपलब्ध माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील १२१ मंडळांपैकी १२० ठिकाणी यंत्रे बसविण्यात आली असून, एक मंडळ अद्याप वंचित आहे.
धुळे जिल्ह्यातील ६७ मंडळांपैकी केवळ ३९ ठिकाणी यंत्रे बसविण्यात आली आहेत. नंदुरबार जिल्ह्यात सर्व ३६ मंडळांमध्ये यंत्रे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. जळगाव जिल्ह्यात ११० पैकी ८६, तर अहिल्यानगर जिल्ह्यात १३१ पैकी १२९ यंत्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.
एकूण ४६५ ४१० ठिकाणी मंडळांपैकी पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आलेली असून, ५५ मंडळे अद्याप या सुविधेपासून वंचित आहेत. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.