

नाशिक : खासगी शाळांच्या जीवघेण्या स्पर्धेतही नाशिक महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत असल्याचे आशादायक चित्र आहे. गतवर्षाच्या तुलनेत महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्येत तब्बल ६११ ने वाढ झाली असून, पटसंख्या ३० हजार ५३ वर गेली आहे. या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम पटसंख्या वाढीस चालना देणारे ठरले आहेत.
महापालिकेच्या माध्यमातून ८८ प्राथमिक, तर १२ माध्यमिक शाळा चालविल्या जातात. शहरातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी या शाळा शैक्षणिक विकासाच्या केंद्र झाल्या आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांबरोबरच शालेय गणवेश आणि बूट-सॉक्सही मोफत पुरविले जातात. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची वाट सुकर झाली आहे. मात्र केल्या काही वर्षांत खासगी शिक्षण संस्थांचे महापालिकेच्या शाळांवर जणू आक्रमण झाले आहे. खासगी शिक्षण संस्थांनी निर्माण केलेल्या स्पर्धेपुढे महापालिकेच्या शाळांचा निभाव लागणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची खासगी शिक्षण संस्थांकडून होत असलेली पळवापळवी नित्याची झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या झपाट्याने घटत होती.
तत्कालीन प्रशासनप्रमुखांचे या शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे झालेले दुर्लक्ष हेही या विद्यार्थी संख्या घटण्यामागील प्रमुख कारण होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांमुळे पुन्हा एकदा विद्यार्थी वर्ग महापालिकेच्या शाळांकडे वळला आहे. गत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या शाळांची विद्यार्थी संख्या २९ हजार ४४२ इतकी होती. ती यंदा २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात ३० हजार ५३ वर पोहोचली आहे. विद्यार्थी संख्येत ६११ ने वाढ झाली आहे.
या उपक्रमांमुळे विद्यार्थी संख्येत वाढ
महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये 'स्पेलिंग बी' उपक्रम
इंग्रजी शाळांच्या धर्तीवर 'क्लब' आणि 'हाउसेस'
टिंकरिंग लॅब माध्यमातून विद्यार्थ्यांना 'कोडिंग' शिक्षण
पोषण आहाराच्या गुणवत्तेत सुधारणा
गुणवत्तावाढीत माजी विद्यार्थ्यांचा सहभाग
विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासवाढीसाठी वाचन उपक्रम
शासनाच्या 'निपुण' उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी
दिवाळीच्या सुटीमध्ये विज्ञान उपक्रम
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या विविध विद्यार्थी उपयोगी उपक्रमांमुळे महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढत आहे. महापालिकेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तावाढीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
डॉ. मिता चौधरी, प्रशासनाधिकारी, शिक्षण विभाग, मनपा.