

निफाड : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात गेल्या २४ तासांत काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटना घडल्या आहेत. विविध दुर्घटनांत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. रानवड साखर कारखान्याजवळ कौटुंबिक वादातून पित्याने आपल्या तीन चिमुरड्यांसह पालखेड डाव्या कालव्यात उडी घेतल्याची घटना घडली. यातील दोन बालकांचे मृतदेह हाती लागले आहेत.
रानवड कारखाना परिसरातील रहिवासी दीपक पवार (२८) याचे आपल्या कुटुंबाशी वाद झाले होते. याच वादातून त्याने आपल्या तीन मुलांसह पालखेड डाव्या कालव्यात उडी घेतली. शोध मोहिमेत प्रसाद दीपक पवार (दीड वर्षे) आणि वीर दीपक पवार (५ वर्षे) या दोन निष्पाप बालकांचे मृतदेह सापडले.
मात्र, पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे दीपक पवार आणि त्याचा तिसरा मुलगा अविनाश दीपक पवार (३ वर्षे) हे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. दुसरी घटना बोकडदरे येथे घडली. ज्योती अनिल शिखरे (१७) ही तरुणी पाटावर कपडे धुण्यासाठी गेली असता पाण्याचा अंदाज आला नसल्याने प्रवाहात वाहून गेली.
सोबत असलेल्या दोन मुलींनी आरडाओरडा केला. मात्र, ज्योतीचा पत्ता लागला नाही. देवपूर शिवारात पेठ येथून कामानिमित्त आलेली मयूरी करमचंद वराळे (१७) ही युवती शेततळ्यात पडून ठार झाली. एकाच दिवसात निफाड परिसरात घडलेल्या या दुर्घटनांमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
कालव्याला पाणी असल्यामुळे बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यास अडचणी येत आहेत. स्थानिक पोलिस आणि पोहणाऱ्या टीमच्या मदतीने शोधमोहीम राबवली जात आहे. नागरिकांनी कालवा परिसरात वावरताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. याबाबत निफाडचे पोलिस निरीक्षक गणेश गुरव अधिक तपास करीत आहेत.