

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न राज्यभर चर्चेचा विषय ठरलेला असतानाच, या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांमध्येच राजकारण तापलं आहे. नाशिक राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरात होर्डिंग्ज अस्त्र उगारात छगन भुजबळ यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करावी, अशी थेट मागणीच मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यावर मंत्री भुजबळ यांनी खुली नाराजी व्यक्त करत, तत्काळ होर्डिंग्स उतरण्याचे आदेश दिले.
त्यामुळे चार तासांत सर्व होर्डिंग्स काढण्यात आले. यातच, भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणावर भाष्य करत मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटल्याप्रमाणे नाशिकच्या खड्ड्यांचा प्रश्न सहा महिन्यांत निकाली लागून काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरात मोठे होर्डिंग लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भुजबळ यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे.
'दत्तक नाशिकचे पालक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिककरांना खड्ड्यातून बाहेर काढा, ही सर्वसामान्य नाशिककरांच्या मनातील भावना आहे,' अशा आशयाचे होर्डिंग्ज झळकविले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मंत्री भुजबळ यांनी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून दिली होती. त्यानंतर मंत्री महाजन स्वतः रस्त्यावर उतरले आणि संबंधित अधिकाऱ्यांना पुढील आठ ते दहा दिवसांत शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश दिले होते. या घडामोडींनंतर सोमवारी (दि. ३) राष्ट्रवादी युवक काँग्रेसने थेट राजकीय भूमिका घेत भुजबळ यांना पालकमंत्री करण्याची मागणी होर्डिंगच्या माध्यमातून पुढे आणली आहे.
नाशिकचे पालकमंत्रीपद सध्या रिक्त असल्याने प्रशासनावर प्रभावी वचक ठेवू शकणारे, नाशिकची जाण असलेले आणि भूमिपुत्र असलेले भुजबळ यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात यावी. होर्डिंग्सच्या माध्यमातून सर्वसामान्य नाशिककरांच्या भावना मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी स्पष्ट केले.
नाशिकमधील खड्ड्यांच्या समस्येनंतर मंत्री भुजबळ यांना पालकमंत्री करण्याची मागणी करणारे फलक शहरात राष्ट्रवादी युवकतर्फे लावण्यात आल्याने यावर मंत्री भुजबळ यांनी थेट नापसंती व्यक्त केली आहे. 'ज्यांनी हे फ्लेक्स लावले आहेत, त्यांच्यावर मी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, माझ्या नावाचे ते सर्व होर्डिंग्स तातडीने काढायला सांगितले आहेत,' असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. 'नाशिकचे खड्डे बुजवून रस्त्यांची कामे व्यवस्थित करून घेणे हा मुख्य मुद्दा आहे, याचा अर्थ भुजबळांनाच पालकमंत्री करा असा होत नाही,' असेही त्यांनी ठामपणे सांगितलेले आहे.
मुंबईत सोमवारी (दि. ३) प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री भुजबळ यांनी भूमिका स्पष्ट केली. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे ४ ते ५ नागरिकांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून देत मंत्री भुजबळ यांनी पालिका प्रशासन, कुंभमेळा प्राधिकरण आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली.
मंत्री भुजबळ म्हणाले, 'डांबर आणि पाणी यांची दुश्मनी असते. केवळ खड्ड्यात डांबर-माती टाकून निघून जाने म्हणजे खड्डे भरणे नव्हे, ते टिकू शकत नाही. जिथे खड्डा पडला आहे, तिथे व्यवस्थित चौकोनी कट करून, तो थोडा खोल करावा लागतो. त्यानंतर त्यात 'ॲसफाल्ट कोल्ड मिक्स' दाबून भरले तरच तो खड्डा टिकतो. सध्या कायमयोग्य पद्धतीने होत नसल्याने अपघातात आणि मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
पाऊस उघडताच रस्ते दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अशी सूचना त्यांनी केली. वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूला काम सुरू असताना दुसऱ्या बाजूला खड्डे राहणार नाहीत, याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे. तसेच, नागरिक, नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी त्रस्त असून, अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, असेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.