

नाशिक / नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी दोन्ही राष्ट्रवादीतील वरिष्ठांकडून दावे - प्रतिदावे सुरू असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण १०० टक्के झाले पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना विनंती करणार असल्याचे खोसकर यांनी सांगितले.
इगतपुरीचे आमदार खोसकर यांनी माध्यमांशी बोलताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. आ. खोसकर म्हणाले की, जर दोन्ही पक्षांना वाटत असेल की आपला नेता गेला. नेत्याला जर खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर त्यांचे दोन-तीन महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी जे प्रयत्न सुरू होते तसे झाले तर आनंद होईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या गॉडफादर आहेत. त्यांच्या मागे दोन्ही पक्षांनी भक्कम उभे राहायला हवा, असे मतही खोसकर यांनी व्यक्त केले.
शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. जयंत पाटील, राजेश टोपे हे अनुभवी नेते आहेत. १२ फेब्रुवारीला विलीनीकरण होणार हे आम्ही ऐकले होते. दादांनी आम्हाला तशी कल्पना दिली नव्हती. परंतु, विलीनीकरण होणार हे १०० टक्के माहिती होते, असे खोसकर यांनी सांगितले.
विलीनीकरण जर झाले तर राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या असाव्यात. शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा. शशिकांत शिंदे दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत जे म्हणत आहेत, ते १०० टक्के झाले पाहिजे. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास सर्वांनाच दिलासा मिळेल, असे खोसकर यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार यांनी ज्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्या दिवशीच ३० ते ३५ आमदार विलीनीकरणाच्या बाजूने होते. तशी चर्चाही झाली होती. मंत्री मकरंद पाटील यांनी तर स्पष्ट सांगितले, असा दावा त्यांनी केला. पक्षाच्या आमदारांची बैठक सुनेत्रा पवार यांनी बोलावली आहे. त्यात मी विलीनीकरण व्हावे, अशी भूमिका मांडणार असल्याचे खोसकर यांनी सांगितले. यासह सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनाही विनंती करणार असल्याचे खोसकर यांनी सांगितले.