

नाशिक : निल कुलकर्णी
दृश्यकला असो की, अविष्कृत कला त्या सरहद्दी, भाषा, प्रांत, सरहद्द, जात धर्म, वर्ण यांच्या 'पलिकडे' असते म्हणूनच ती 'वैश्विक' होते. नाशिकमध्येही काही नवशारदा अविष्कृत तसेच दृश्यकलेत कलेतून सांस्कृतिक सुसंवाद साधत आहेत. कला का जगावे हे शिकवते आणि जगण्याला नवे परिमाण, संदर्भ देते. कलाकार कलासादरीकरणातून 'स्वानंदा'ची अनुभूती घेतो तसेच तो रसिकांनाही कलेमधून आनंद वाटत असतो. कलेतून आंतरसांस्कृतिक संवादासह शांती, सौदार्ह समाजनिर्माणाचाही संदेश दिला जात असतो. कलेतून समाजात सुसंवादाचे वातावरणनिर्मिती करण्याऱ्या अशाच काही 'आधुनिक शारदां' च्या कलेचा हा सांस्कृतिक 'कोलाज'!
नृत्यातून समाजप्रबोधन, दिशा
विद्या देशपांडे म्हणतात नर्तनकलेत ऊर्जा, शक्ती अन सकारत्मकता असतेच. नर्तन हे समाजप्रबोधन, संवाद साधणारी प्राचीन अभिजात कला आहे. नर्तनातून पुराणकथा, ऐतिहासिक पात्रांतून अनेक अविष्कार देशविदेशात सादर केले. दुर्गा, कालिका, महालक्ष्मीसारख्या नवदुर्गा आणि झाशीच्या राणीपासून, कल्पना चावला अशा अनेक आधूनिक नवदुर्गाच्या कथाही त्यांनी नृत्यातून सादर केल्या. स्त्रीभ्रूण हत्या विषय नृत्यातून घेऊन पोटीतील स्त्रीगर्भाची हत्या न करता तिच्याशी संवाद साधणारे नृत्य आणि सरतेशेवटी तिला जन्म देणारी माता, असे सकारात्मक बोधप्रद नृत्यातून त्यांनी जनसंदेशही दिला आहे. प्रत्येक स्त्री कणखर असते. तिच्या विश्वातील दुर्गाच असते. स्त्री कठपूथली नाहीच पण काही दोर तिने कापले पाहीजे. मात्र, काही दाेर असले तरी स्वअनुशासन, मूल्यांसोबत राहूनही ती प्रगती करु शकते. स्त्रीने स्वत:चा कार्यकर्तृत्वातून आकाशात उडाण घ्यावी, असे त्या सांगतात.
दृश्यकलेतून स्त्रीमनाच्या व्यथा!
मानसी सागर या सध्या गोखले एज्युकेशन संस्थेच्या जेडीसी बिटको हायस्कूलमध्ये कलाशिक्षका आहेत. त्या उत्तम चित्रकर्ती आहेत. कविता लेखन ते नृत्य, नाट्य अन् संगीत वाद्य कलेतून त्या कलाउपासना करत आहेत. विद्यार्थ्यांसोबत मैत्री असणारी उत्तम व संवेदनशील कला शिक्षिका आहे. आजवर अनेक वृत्रपत्रे, नियतकालिके, सामाजिक माध्यमांनी यांच्या कर्तृत्वाची दाखल घेतली आहे. सौम्य तरीही परखडपणे आपले मत मांडणाऱ्या निर्भीड चित्रकर्तीने आपल्या समकालिन, रचना तसेच व्यक्तीचित्रांच्या वैविध्यपूर्णतेने रसिकांची मन जिंकली आहेत. स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय, स्त्री मनाची व्यथा यांना वाचा फोडणारी संवेदनशील चित्रकर्ती. त्यांची चित्रे भारतातच नव्हे तर भारताबाहेरही गेलेली आहेत. चित्रकला ही उसवलेली समाजवीण साधणारी कला आहे. त्यामुळे अराजकतेत शांती-संवाद निर्माण करण्याचे कार्य चित्रे करु शकतात, असा तिचा ठाम विश्वास आहे.
नृत्यातून स्वत्वाचा शोध जनसंवाद
मैथिली कुलकर्णी गुरू ताई नाडगौडा यांच्या शिष्या. वयाच्या सहाव्या वर्षी कथक शिकण्यास प्रारंभ केला. त्यांनी प्रथम श्रेणीत विशारद व नंतर अदिती पानसे यांच्या मार्गदर्शनाखाली अलंकार पूर्ण केले. भरत कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स मधून कथकमध्ये एमए केले. त्यांनी आपल्या पद्न्यास, मुद्रा नृत्यातील शैलीतून रसिक मनावर मोहिनी घातली. त्यांनी नवदुर्गांची आराधना नृत्याविष्कारातून केली. कथक देवीची महती, तिच्या रूपांचे वर्णन करणारे नृत्य असते. आधुनिक स्त्री कणखर, स्वाभिमानी आणि लिलया घर संसार सांभाळून कलाआराधेतून स्वसंवादासाेबत जनसंवाद साधत असे, असे त्या म्हणतात. स्त्रियांनी या काळात 'कथक' नृत्य शिकणे गरजेचे आहे. यातून सुसंवाद, बोधप्रद संदेश देण्याचे काम लिलया होते, असे त्या सांगतात.