

देवळा : तालुक्यातील वरवंडी येथे शुक्रवारी १ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. मात्र, नियमांनुसार सूर्यास्तानंतर ध्वज उतरविणे आवश्यक असताना सदर ध्वज रात्रभर तसाच फडकत राहिल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार देवळा तालुक्यातील वरवंडी येथे शुक्रवारी (दि.१) मे रोजी महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयावर ध्वजारोहण करण्यात आले. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांने नियमानुसार सूर्यास्तानंतर ध्वज उतरविणे आवश्यक असताना सदर झेंडा (ध्वज) दुसऱ्या दिवसापर्यंत तसाच फडकत राहिल्याची घटना याठिकाणी घडली आहे.
हा प्रकार गावातील काही जागरूक नागरिकांच्या निदर्शनात आल्यानंतर गावात नाराजी व्यक्त केली जात असून, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा गावात सुरू आहे. राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून, अशा प्रकारच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने पुढील वेळी योग्य ती काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. तसेच संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी संदीप चव्हाण, किशोर चव्हाण, विलास शिंदे, सुनील चव्हाण, गोरख विश्वास आदींनी केली आहे .