

नाशिक : मालेगाव तालुक्यातील वळवाडी, कोठरे बु., निमशेवडी येथे कार्यरत असताना विविध योजनांतील २० लाख ९० हजार ५९५ रुपयांचा अपहार आणि कामकाजात कसूर केल्याप्रकरणी ग्रामसेवक विनायक सूर्यवंशी यांना बडतर्फ करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. संबंधित सूर्यवंशी यांना सेवेतून बडतर्फ करत ९० दिवसांच्या आत त्यांच्याकडून अपहार करण्यात आलेली रक्कम वसूल करावे, अन्यथा त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे आदेशात म्हटले आहे.
जिल्ह्यात गेल्या महिनाभरात चौथी कारवाई असल्याने ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच नांदगाव तालुक्यातील मांडवड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुभाष चव्हाण यांनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा साडेतीन लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर लगेचच मेंदूच्या आजाराचे बोगस प्रमाणपत्र दाखल केल्याप्रकरणी महिरावणी येथील ग्रामसेवक सुनील निकम याच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले होते. या दोन घटना ताज्या असतानाच चांदवड तालुक्यातील पिंपळद येथे मद्यविक्रीचा परवाना परस्पर दिल्याप्रकरणी देवीदास पाटील या ग्रामसेवकाचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर आता हा २१ लाखांचा अपहार करणाऱ्या ग्रामसेवक विनायक सूर्यवंशीला वेळोवेळी समज देऊनही त्याच्या कामकाजात सुधारणा होत नसल्याने चौकशी करण्यात आली होती.
ग्रामसेवक सूर्यवंशी यांच्यावर वरिष्ठांच्या आदेशाची अवमान्यता करणे, मासिक, पाक्षिक व विशेष सभांना तसेच ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयात अनधिकृतपणे गैरहजर राहणे, मासिक प्रगती अहवालासह कोणतीही माहिती वरिष्ठ कार्यालयांस सादर न करणे, ग्रामपंचायत वळवाडी, कोठरे बु., निमशेवडी येथील ग्रामपंचायतीचा कार्यभार हस्तांतरित न करणे यांसोबतच ग्रामपंचायत वळवाडी ग्रामनिधीचे ५० हजार १४८, यशवंत ग्रामसमृद्धी योजनेचे ५ हजार ५०० रुपये, हरियाली योजनेंतर्गत १९ लाख ६९ हजार ५५६ आणि १२ व्या वित्त आयोगाचे ६५ हजार ३९१ रुपये असे एकूण २० लाख ९० हजार ५९५ रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पाचही दोषारोप सिद्ध झाल्याने त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.