

नाशिक : विदर्भ, मराठवाड्याप्रमाणेच उत्तर महाराष्ट्रातदेखील उष्णतेची लाट आली असून, थंड हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकचे तापमान ४० अंश सेल्सिअसपासून अवघे एक पाऊल दूर आहे. गुरुवारी (दि.२३) नाशिकचे कमाल तापमान ३९.९ अंश सेल्सिअस इतकी नोंदविले गेल्याने, मे महिना यापेक्षाही चटके देणारा ठरण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने नाशिकला चार दिवसांचा यलो अलर्ट दिल्याने, जिल्ह्यावर अवकाळीचे सावट कायम आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरीदेखील लावली. मात्र, त्याचबरोबर कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने, उकाड्यातदेखील सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवडाभरापासून नाशिकचे कमाल तापमान ३९ अंश व त्यापेक्षा अधिक नोंदविले जात आहे.
त्यामुळे लवकरच नाशिक चाळिशी पार करणार असल्याने, यंदाचा उन्हाळा नाशिककरांसाठी तापदायक ठरणार आहे. गतवर्षी नाशिकमध्ये ७ मेपासून अवकाळी पाऊस बरसण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे नाशिककरांना गेल्या वर्षी उन्हाचे फारसे चटके सोसावे लागले नाहीत. यंदा मात्र, एप्रिलच्या मध्यापासूनच कमाल तापमानाने वाढीव नोंद केल्याने, यंदाचा उन्हाळा नाशिककरांसाठी त्रासदायक ठरणार आहे...
तापमानातदेखील मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी नाशिकचे किमान तापमान २३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. त्यामुळे दिवसाबरोबरच रात्री अन् पहाटेच्या सुमारास उकाडा वाढला आहे. दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका अधिक असल्याने, नाशिककर घराबाहेर पडणे टाळत आहेत. दुपारच्या दरम्यान घराबाहेर पडताना, नाशिककरांनी पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे.