

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मार्च महिन्याच्या मध्यातच नाशिकचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने, यंदाचा उन्हाळा हा जीवघेणा ठरण्याचे संकेत आहेत. गुरुवारी (दि.१२) शहरातील तापमानाची ३८.५ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली.
उन्हाच्या झळा इतक्या तीव्र होत्या की, घराबाहेर पडणाऱ्या नाशिककरांची लाहीलाही झाल्याचे दिसून आले. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्र आणि गुजरातवर जास्त दाबाची स्थिती (अँटिसायक्लोनिक) सक्रिय आहे.
यामुळे हवामान कोरडे झाले असून, तापमानात मोठी वाढ होत आहे. याचा फटका केवळ विदर्भालाच बसला नसून, उत्तर महाराष्ट्रही ४० अंशांच्या उंबरठ्यावर आहे. थंड हवेसाठी ओळखले जाणारे नाशिकही चांगलेच तापले असून, कमाल तापमानाने या हंगामातील सर्वोच्च स्थिती गाठली आहे.
कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी किमान तापमान १६.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. त्यामुळे पहाटेचा अपवाद वगळता, इतरवेळी हवामानात उष्णता असल्याने, नाशिककरांना उकाड्याचा भारतीय हवामान विभागाच्या मते,
पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज असल्याने, नाशिकचे तापमान मार्च महिन्यातच ४० अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे आजारपणांमध्येदेखील वाढ झाली आहे. तापमान वाढल्यास उष्माघाताचे रुग्ण पुढे येण्याची शक्यता असल्याने, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष उभारण्याची तयारी सुरू झाली आहे.