

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वांत मोठ्या उंबरदरी धरणातील गाळ उपसा कामाला मोठ्या प्रमाणात सुरुवात करण्यात आली. या उपक्रमामुळे धरणाच्या पाणी साठवण क्षमतेत तब्बल ५ कोटी ३० लाख लिटरने वाढ होणार आहे. राह फाउंडेशन व आयआयटी संस्था, मुंबई यांच्या आर्थिक मदतीतून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे.
पश्चिम भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने दरवर्षी उंबरदरी धरण भरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पाणी नदीपात्रात वाहून जात होते. धरणात साचलेल्या गाळामुळे मूळ पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. त्यामुळे गाळ उपसा करण्याची मागणी ठाणगाव ग्रामपंचायतीने खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे केली होती.
त्यांच्या प्रयत्नातून राह फाउंडेशन, आयआयटी संस्था, पानी फाउंडेशन, शिवप्रेमी शेतकरी गट ठाणगाव तसेच ग्रामपंचायत ठाणगाव यांच्या सहकायनि या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. धरण गाळमुक्त झाल्यास भविष्यात ठाणगावसह परिसरातील गावांची पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
कामाच्या प्रारंभप्रसंगी राह फाउंडेशनचे प्रथमेश देशमुख, पानी फाउंडेशनचे भूषण भामरे, गणेश खामकर, रुचिका ढिकले, स्मिता कसबे, माजी जिल्हा परिषद सदस्या वनिता शिंदे, उपसरपंच विलास मोरे, पानी फाउंडेशन टीमचे सदस्य रामहरी रेवगडे, नितीन पाटोळे, विनोद शिंदे, शिवराज शिंदे, संतोष शिंदे, गौरव मोरे, सुमित शिंदे, रावसाहेब गुंड, उत्तमराव शिंदे, हृषिकेश शिंदे, योगेश शिंदे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान
मागील वर्षापासून पानी फाउंडेशन व शिवप्रेमी शेतकरी गटाने सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. गाळ उपसा झाल्यानंतर धरणाची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मोठी मदत होणार असून, त्याचा थेट फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे