

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक ग्रामीण पोलिस दलात प्रशासकीय कारणास्तव मोठ्या प्रमाणावर प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांसह जिल्हा विशेष शाखेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत.
या बदल्यांमुळे ग्रामीण पोलिसांच्या कार्यपद्धतीत अधिक गतिमानता आणि प्रभावी समन्वय साधण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. बदली आदेशानुसार प्रीतम चौधरी यांच्याकडे त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. श्रीराम पवार यांची सिन्नर, महेश कुलकर्णी यांची ओझर, गणेश गुरव यांची पिंपळगाव बसवंत,
नागेश मोहिते यांची निफाड, घनश्याम बळफ यांची इगतपुरी, संदीप मंडलिक यांची येवला शहर, तर संदीप बोरसे यांची येवला तालुका पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच योगेश घोरपडे यांच्याकडे जिल्हा विशेष शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, ओझर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन कंडारे यांची अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी शनिशिंगणापूर येथील पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांची वावी पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली.
या व्यापक बदल्यांमुळे नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या कामकाजात नव्या जबाबदाऱ्यांचे वाटप झाले असून, कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नाशिकमध्ये २०२७ मध्ये कुंभमेळा होत आहे. कुंभमेळ्याचे ध्वजारोहण ३१ ऑक्टोबर २०२६ आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांची भूमिका मोठी असणार आहे.