

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून नाशिक रेल्वेस्थानक करण्याच्या महासभेवरील प्रशासनाच्या प्रस्तावाला शिवसेने (उबाठा) ने कडाडून विरोध दर्शविला आहे. रेल्वे स्थानकाचे नाव बदलल्यास लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. नाशिकरोडची ओळख पुसली जाऊन स्थानिकांच्या भावनांना ठेच पोहोचेल, असा दावा करताना महासभेवरील नामकरणाचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी उबाठातर्फे करण्यात आली आहे.
नाशिकरोड रेल्वेस्थानकाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या रेल्वे स्थानकाची स्थापना १८६२ मध्ये ब्रिटिश राजवटीत झाली. मुंबई-भुसावळ मुख्य रेल्वेमार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक म्हणून विकसित झाले असून, नाशिकरोड नाव अधिकृतपणे वापरात आहे. नाशिक शहरापासून ८-१० किलोमीटर अंतरावर असल्याने नाशिक शहराकडे जाणारा रस्ता या संदर्भातून नाशिकरोड नाव देण्यात आले आहे.
जवळपास १५० वर्षांपासून सातत्य राखून आहे. नाशिकरोड स्थानक भौगोलिकच नव्हे तर सांस्कृतिक वारसा बनले आहे. रेल्वे स्थानकाच्या स्थापनेनंतर नाशिकरोड परिसरात आयएसपी, सीएनपी कारखाना, लष्करी छावणी, ईरीन तसेच औद्योगिक वसाहती विकसित झाल्या. नाशिकरोड हा केवळ नाशिक शहराचा भाग नसून स्वतंत्र ऐतिहासिक ओळख असलेला विभाग आहे. लाखो नागरिकांची शासकीय कागदपत्रे, व्यावसायिक नोंदी, मालमत्ता अभिलेख, बँक व्यवहार आणि औद्योगिक नोंदी नाशिकरोड या नावाने नोंदणीकृत आहेत. ऐतिहासिक ओळखी लोप होण्याची शक्यता आहे.
नामकरणामुळे स्थानिक नागरिकांच्या भावनांना ठेच पोहोचण्याची शक्यता असून, सामाजिक असंतोष निर्माण होऊ शकतो. पर्यटन, धार्मिक व औद्योगिक संदर्भात नाशिकरोड नाव देशभर परिचित असल्याने गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदरचा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी शिवसेना (उबाठा) च्या वतीने दिलेल्या निवेदनात केली आहे.
"नाशिकरोड रेल्वे स्टेशन नाशिकच्या इतिहासाशी जोडलेले, भारतीय रेल्वेचा एक अत्यंत जुना भाग आहे आणि आजही त्याचे नाव त्याच्या स्थापनेपासून प्राचीन आहे. सामाजिक, स्थानिक भावनेचा विचार करून नामकरणाचा निर्णय घेणे आवश्यक आहे."
- योगेश गाडेकर, नगरसेवक