

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
यंदा उशिराने सुरू झालेल्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून, उत्तर महाराष्ट्रात देखील पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. नाशिकच्या घाटमाथा परिसराला शुक्रवारी (दि.३१) रेड अलर्ट, तर शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासन अलर्ट मोडवर आले असून, नागरिकांनी नदीपात्र, पूल, धबधबे आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाने टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
८ जुलै रोजी झालेल्या दमदार पावसानंतर २३ जुलैपासून पुन्हा पावसाने दम'धार' बरसण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सर्वत्र पाऊस बरसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे तसेच प्रमुख जलसाठे काठोकाठ भरली आहेत.
दरम्यान, शुक्रवारी शहरासह जिल्ह्यात पाऊस अतिमुसळधार बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याला रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, धुळ्यात देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे गोदावरीसह सर्व नद्या ओसंडून वाहत आहेत. मुसळधार पाऊस बरसल्यास, या नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने, प्रशासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट मोडवर आला आहे. नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
मागील काही दिवसांपासून गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्याने, गोदावरी नदीला पूरस्थिती आहे. मात्र, गुरुवारी (दि.३०) विसर्गात मोठ्या प्रमाणात घट केल्याने, पूर ओसरला आहे. बुधवारी (दि.२९) धरणातून ३ हजार २७६ क्युसेक्सने विसर्ग केला जात होता. शुक्रवारी त्यात घट करून १,२९६ पर्यंत विसर्ग सुरू आहे. मात्र, मुसळधार पाऊस बरसल्यास, पुन्हा विसर्गात वाढ केली जाण्याची शक्यता आहे.