नाशिक : शहर व परिसरात सलग तिसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने हजेरी लावली. मंगळवारी (दि. २४) दिवसभर सरी कोसळल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यातही विविध ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. जिल्ह्याला पुढील दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राजस्थान व गुजरातच्या कच्छ भागातून मान्सून माघारी फिरला आहे. जिल्ह्याच्या हवामानावर त्याचा परिणाम झाला आहे. नाशिक शहरात मंगळवारी पहाटेपासूनच हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. अधूनमधून हजेरी लावणाऱ्या पावसाचा सायंकाळी 6 च्या सुमारास जोर अधिक वाढला. त्यामुळे कार्यालयांतून घराकडे परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. तसेच शहरात सखल भाग व रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने चालकांना वाहतूक कोंडीला सामाेरे जावे लागले. शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत १०.३ मिमी पर्जन्याची नोंद करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पाऊस तळ ठोकून आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तसेच पेठ-सुरगाणा आदी भागांत त्याचा जोर अधिक असून अन्यही तालुक्यात तो हजेरी लावत आहे. जिल्ह्यात सकाळी 8 पर्यंत संपुष्टात आलेल्या २४ तासांत सरासरी १४.४ मिमी पर्जन्याची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात बुधवारी (दि. २५) व गुरुवारी (दि. २६) आॅरेंज अलर्ट देण्यात आला असून, शनिवारनंतर (दि. २८) त्याचा जोर कमी होईल.