Jayakwadi Dam: मराठवाड्यासाठी शुभ वार्ता, नाशिकमध्ये 24 दिवसात दुप्पट पाऊस; जायकवाडीला यंदा 2 महिने आधीच पाणी

आषाढी एकादशीसाठी ३०० विशेष बसेस सज्ज
Nashik Rain News
Nashik Rain NewsPudhari Photo
Published on
Updated on

नाशिक : शहरात आणि परिसरात रात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून, सर्वत्र संततधार सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे, ज्यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे. एकीकडे प्रशासन पावसाळ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असताना, दुसरीकडे आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी ३०० विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

पावसाची रिपरिप सुरू, गोदावरीच्या पातळीत घट

नाशिक शहर आणि जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असून, काहीशा विश्रांतीनंतर रात्रीपासून पुन्हा संततधार सुरू झाली आहे. हवामान विभागाने आजही घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. सततच्या पावसामुळे गंगापूर धरणातून सध्या १७६० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येऊ शकतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सतर्क

गंगापूर आणि दारणा धरणातून सातत्याने पाणी सोडण्यात येत असल्याने आतापर्यंत सुमारे ४ ते ५ टीएमसी पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने गेले आहे. यामुळे मराठवाड्याची तहान भागण्यास मदत होणार आहे. दरम्यान, नाशिकमधील गोदावरीच्या पाणी पातळीत काहीशी घट झाली असून, दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी आहे. असे असले तरी, प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहे.

नाशिकमध्ये 24 दिवसांत दुप्पट पाऊस

नाशिकमध्ये २४ दिवसांत दुप्पट पाऊस पडला असून जिल्ह्यातील धरणेही गतवर्षीपेक्षा ४१% अधिक भरली आहेत. याचा परिणाम म्हणजे मराठवाड्यासाठी महत्त्वाचं धरण अशी ओळख असलेल्या जायकवाडीला यंदा दोन महिने आधीच पाणी पोहचले आहे. नाशिक जिल्ह्यात जूनच्या २४ दिवसांत २१८.४ मिलिमीटर पाऊस पडला असून जिल्ह्याच्या १०४.५ मिलिमीटर सरासरीपेक्षा दुप्पटीहून अधिक पाऊस झाला आहे.

आषाढी एकादशीसाठी ३०० विशेष बसेस सज्ज

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या विठ्ठलभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने जय्यत तयारी केली आहे. नाशिक जिल्ह्यातून पंढरपूरसाठी ३०० विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. आषाढी एकादशी ६ जुलै रोजी असून, भाविकांची गर्दी लक्षात घेता एकादशीच्या आधी आणि नंतरही या विशेष बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, जेणेकरून भाविकांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास करता येईल.

सेवा कालावधी: २ जुलै ते ११ जुलै दरम्यान या विशेष बसेस धावतील.

प्रमुख आगार : नाशिक, मालेगाव, मनमाड, सिन्नर, निफाड, पिंपळगाव आणि पेठ या प्रमुख आगारांसह इतर आगारांतूनही बसेस सोडण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news