

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धाचा वणवा आता ग्रामीण भागातील कृषी क्षेत्रापर्यंत पोहोचला आहे. युद्धाच्या परिणामांमुळे कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत होऊन शेतीसाठी लागणाऱ्या पीव्हीसी पाइप, फिटिंग्ज आणि इतर कृषी साहित्याच्या किमतीत ३५ ते ४० टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे.
यामुळे उन्हाळ्यात पाइपलाइनची कामे काढणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून, अनेकांनी ही कामे तूर्त पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात साधारणपणे खरीप हंगामातील पीक काढणीनंतर उन्हाळ्यामध्ये विहीर खोदकाम आणि पाइपलाइनची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली जातात आणि ती वेळेतच होणे आवश्यक असते मात्र, सध्या बाजारपेठेत गेल्यावर पाइपचे दर ऐकून शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे.
जो ४ इंची पाइप पूर्वी १,३०० रुपयांना मिळत होता, तो आता थेट १,८२० रुपयांवर पोहोचला आहे. युद्धविराम न झाल्यास आणि कच्च्या मालाची टंचाई कायम राहिल्यास किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे यंदा उन्हाळ्यात पाइपलाइनची कामे मंदावलेली पाहायला मिळत आहेत.
शेतीचे नियोजन विस्कळीत
वडेदारणा येथील प्रगतशील शेतकरी सागर सोनवणे यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. दरवर्षी पाइपलाइनची देखभाल आणि नवीन कामे करणे गरजेचे असते, मात्र पाइपचे दर गगनाला भिडल्याने यंदा हे खर्च परवडणे अशक्य झाले आहे. खते, बियाणे आणि आता पाइपच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून किमती सातत्याने वाढत असल्यामुळे आम्हीही नवीन खरेदी मर्यादित केली आहे, केवळ अत्यावश्यक गरज असलेले शेतकरीच सध्या पाइप खरेदी करत आहेत.
- सुशील सोनवणे, पीव्हीसी पाइप वितरक