

जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत ४६ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता आपल्या खऱ्या रणनीतीला सुरुवात केली आहे. महायुतीच्या विजयाचा ढोल एकीकडे वाजत असताना, दुसरीकडे नवनिर्वाचित महापौर दीपमाला काळे आणि भाजपने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला चक्क कचरापेटी दाखवली आहे. विजयाच्या जाहिरातींमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक पालकमंत्र्यांचे फोटो गायब करून भाजपने जळगावात ‘एकला चलो रे’चा नारा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
४६ चा आकडा अन् सत्तेची नशा
जळगाव महापालिकेत भाजपने ४६ जागांवर झेंडा फडकवत एकहाती सत्ता काबीज केली आहे. शिवसेनेला २२ जागांवर समाधान मानावे लागले. बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा एकट्या भाजपकडे असल्याने आता त्यांना मित्रपक्षांची गरज उरलेली नाही, असाच संदेश भाजपने आपल्या कृतीतून दिला आहे. महापौरपदी वर्णी लागताच दीपमाला काळे यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकात आणि शहरात झळकलेल्या जाहिरातींमध्ये केवळ भाजपच्या नेत्यांचीच मांदियाळी पाहायला मिळत आहे.
शिंदेंच्या सेनेला ‘नो एन्ट्री’
भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि स्थानिक भाजप नेत्यांचे फोटो मोठ्या दिमाखात लावले आहेत. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे महायुतीचे सरकार असतानाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि जळगावचे पालकमंत्री किंवा शिवसेनेच्या स्थानिक आमदारांना या जाहिरातींमध्ये कुठेही स्थान मिळालेले नाही. ‘महायुतीचा विजय’ असे केवळ नावापुरते म्हणायचे आणि प्रत्यक्षात श्रेय मात्र एकट्या भाजपने लाटायचे, असा प्रकार सध्या जळगावात सुरू आहे.
महापौरांचा भाजपच ‘अजेंडा’
नवनिर्वाचित महापौर दीपमाला काळे यांनी पहिल्याच दिवशी आपण केवळ भाजपच्याच असल्याचे अधोरेखित केले आहे. महापालिकेत भाजपमुळेच विकास झाला आणि भविष्यातही भाजपचाच झेंडा फडकत राहील, असे नियोजन त्यांनी केल्याचे दिसते. शिवसेनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक डावलून भाजपने आगामी विधानसभा आणि इतर निवडणुकांसाठी आपला ‘स्वबळाचा’ अजेंडा आतापासूनच सेट केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेनेची अवस्था ‘ना घर का ना घाट का’
एककीडे शिवसेनेचे नेते हा महायुतीचा विजय असल्याचे सांगत फिरत आहेत, तर दुसरीकडे भाजप त्यांना सत्तेच्या दारातही उभं करायला तयार नाही. ज्या शिवसेनेच्या बळावर महायुतीची गणिते मांडली जातात, त्याच शिवसेनेला जळगावात भाजपने सपशेल वाऱ्यावर सोडले आहे. आता भाजपच्या या उद्धटपणावर शिवसेनेचे स्थानिक नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.