

मालेगाव : चोरट्या पद्धतीने सुरू असलेल्या हातभट्टी दारू अड्ड्यांवर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने बुधवारी (दि. २९) स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे हद्दीतील काष्टी गावाच्या शिवारात, मोसम नदीकाठी काटेरी झाडाझुडपांत सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यांवर धाड टाकली. या कारवाईत गावठी दारूनिर्मितीसाठी वापरले जाणारे नवसागरमिश्रित रसायन, साहित्य व उपकरणांसह सुमारे दोन लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
छाप्यादरम्यान विष्णू अशोक सोनवणे आणि केदा तुळशीराम गायकवाड (दोघे रा. काष्टी, ता. मालेगाव) हे पोलिसांची चाहूल लागताच पसार झाले. दोघांविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांच्या तपासात हातभट्टीसाठी नाल्यातील दूषित पाणी, नवसागर, जुन्या बॅटऱ्यांचे सेल, युरिया आणि मानवी आरोग्यास घातक रासायनिक पदार्थांचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अशा गावठी दारूमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, पोलीस हवालदार सुभाष चोपडा, दत्ता माळी यांच्या पथकाने केली.